तथ्य आणि सत्य:

तथ्य आणि सत्य:
तथ्य आणि सत्य यात अगदी थोडसंच अंतर आहे. तथ्य म्हणजे वस्तुस्थिती ही जाणत्या मनाच्या स्तरावर असते तर सत्य म्हणजे समज ही अजाणत्या मनाच्या स्तरावर असते. वस्तुस्थिती मध्ये काही गैर असेल तर ते आपल्याला लगेच पटते परंतु समजेमध्ये काही गैर असेल तर ते आपल्याला सहजासहजी पटत नाही. आपले अजाणत्या मनातील समज, बोध, व अर्थ यामधूनच तर बाहेरील तथ्याचे रूपांतर अजाणत्या मनातील सत्यामध्ये होते. तथ्यावर आपल्या जाणत्या मनाची सत्ता चालते, पण अजाणत्या मनातील सत्य आपल्या जाणत्या मनावर व पर्यायाने आपल्या समग्र जीवनावर सत्ता गाजवते.

आपले अजाणते मन तथ्य व सत्य यात फरक करू शकत नाही ते काम जाणत्या मनाचे आहे. म्हणून कोणत्याही वस्तुस्थितीचा किंवा तथ्याचा सत्य म्हणून स्वीकार करताना आपण व आपल्या जाणत्या मनाने दहा वेळा विचार करावा. आपण आपल्या जाणत्या मनाला पुन्हा पुन्हा हा एक प्रश्न विचारावा की जे आहे ते तथ्य आहे की सत्य आहे? ही वस्तुस्थिती आहे का इतर कोणालातरी वाटलेले सत्य आहे? कारण जर का अजाणत्या मनामध्ये एखादी चुकीची वस्तुस्थिती किंवा तथ्य, सत्य म्हणून प्रस्थापित झाले, तर तेच सत्य समजून अजाणते मन, अजाणतेपणी व नकळतपणे आपल्याकडून आपली इच्छा नसताना, त्याप्रमाणेच बोलणे, वागणे व कृती करवून घेते, अर्थात आपल्या अजाणत्या मनाचे प्रोग्रॅमिंग होते. म्हणून हे अजाणत्या मनाचे प्रोग्रॅमिंग आपण व जाणते मन दोघांनी मिळून सावधपणे, समजून-उमजून, शांतपणे व सजगपणे केलेले बरे, यात घाई गडबड नको. अन्यथा मग बोलायचं होतं एक आणि बोललो दुसरेच, करायचं होतं एक आणि केलं दुसरंच आणि मनात होतं एक आणि झालं दुसरंच अशी आपली केविलवाणी अवस्था होऊन जाते.

Leave a comment