साध्या, छोट्या, नगण्य, त्रासिक, क्लेशदायक, बिनकामाच्या व बिनफायद्याच्या गोष्टींचेही आत्मिक महत्त्व जाणणे व जगणे म्हणजे अध्यात्म.
पर्याय निवडताना:
एखादा पर्याय निवडताना किंवा एखादी कृती करताना, दुसरे काहीतरी जे आपल्यासाठी खरोखर प्राणप्रिय आहे ते आपल्या हातातून सुटून तर जात नाही ना, याची खात्री करायला शिकूया.
काम:
उद्याचे काम आज व आजचे काम आत्ता उरकून टाकण्याच्या नादात, आत्ताचे गरजेचे, महत्त्वाचे व प्राधान्याचे भावनिक स्वरूपाचे काम राहून जाऊ शकते, हे लक्षात घ्यायला शिकूया.
दुःखकारक:
दुःखकारक जगणे म्हणजे वास्तवात कसं आहे? काय आहे? व कसं नाही? ते पूर्ण सोडून देऊन कसं असावं? व काय नसावं? या कल्पनेलाच पकडून जगणे, हे समजून घ्यायला शिकूया.
आशा:
आशा बाळगताना मग त्या स्वतःकडून, इतरांकडून, परिस्थितीकडून, भविष्यकाळाकडून किंवा योगायोगाकडून असल्या तरी त्या फक्त स्वप्नांवर नाही तर वास्तवावर आधारित अशा बाळगायला शिकूया.
औदार्य:
खरे औदार्य म्हणजे जवळ भरपूर असलेली, गरज नसलेली किंवा नावडती वस्तू खऱ्याखुऱ्या गरजूला देण्याऐवजी जवळ थोडीशी असणारी गरजेची किंवा आवडती वस्तू द्यायला शिकणे.
आपुलकी:
समाजातील इतरांना आपल्याबद्दल आपुलकी वाटावी यासाठी आपण आपल्या वैयक्तीक जीवनात खरे दिसायला हवे आणि आपल्या अभिव्यक्तीमध्ये सच्चे असायला हवे.
खात्री:
आपले बाह्य आणि आंतरिक वातावरण सुरक्षित असल्याची खात्री पटल्यानंतरच आपण इतरांच्या नवीन कल्पना मनापासून ऐकू शकतो आणि त्यांच्याकडून नवीन काही शिकू शकतो.
आंतरिक सुरक्षितता:
आपल्या मूळ तत्वांशी, खोल हेतूंशी आणि आंतरिक मूल्यांशी एकनिष्ठ व प्रामाणिक राहूनच आपण आपली आंतरिक सुरक्षिततेची भावना स्थिर करायला व वाढवायला शिकूया.
विश्वास:
संवाद साधताना आपण जर नेहमीच बचावात्मक व संरक्षणात्मक पवित्रा घेत असेल तर आपल्याला इतर लोकांवर थोडा थोडा विश्वास ठेवायला शिकायला हवे.