ताणाचा गळ आणि गुंतणे:
“ताण” म्हणजे जीवनाने आपल्या समोर ठेवलेल्या समस्येबाबत आपल्याला भावनिक द्रुष्ट्या अस्वस्थ वाटणं किंवा जीवनातील प्रसंगाशी दोन हात करण्याची धमक, अक्कल व क्षमता आपल्याकडे नसल्यासारखं वाटणं.
ताणतणावाची कारणे असू शकतात असे मुख्य प्रसंग म्हणजे, एखाद्या माणसाने खरोखर काहीतरी वाईट करणे किंवा बोलणे, कुटुंबातील हिंसाचार, आजारपणं, शाळा व शिक्षण नसणं, घराबाहेर पडणे, घराबाहेर हाकलणे, सामाजिक हिंसाचार इत्यादी. छोट्या छोट्या अडचणींमुळे देखील ताण येऊ शकतो जसे दैनंदिन युक्तिवाद, कौटुंबिक वाद, भविष्यातील अनिश्चितता, असुरक्षितता व अनियमितता इत्यादी. प्रत्येकजण कधी ना कधी ताणतणाव अनुभवतो. थोडासा ताण ही समस्या नाही. परंतु बर्याचदा जास्त ताण शरीरावर परिणाम करतो.
बर्याच लोकांना नावडत्या शारिरीक भावना येतात, जसे मानदुखी, डोकेदुखी, पाठदुखी, पोटात गोळा, घशात कोरड, गळ्यात पट्टा, छातीत धडधड, उरावर ओझे आणि स्नायू आखडणे व गाठाळणे इत्यादी. काही लोकांना त्वचेवर पुरळ येते तर काहींना पचना संबंधीच्या समस्या सुरु होतात. बऱ्याच लोकांना ताणामुळे भूकेमध्ये बदल, लक्ष केंद्रित न होणे, सहजच व उगीचच रागावणे, स्थिर बसता न येणे, झोपेमध्ये बदल, वाईट वाटणे, अपराधी किंवा दोषी वाटणे, काळजी करणे, रडारड करणे, खूप थकलेले वाटणे इत्यादी अनुभव येतात.
तणावग्रस्त लोक भूतकाळातील वाईट, अप्रिय व कडवट गोष्टींबद्दल जास्त विचार करतात. भविष्यातील ज्या गोष्टींबद्दल भीती वाटते, त्याबद्दल ते जास्त चिंता व्यक्त करतात. ताणाबरोबर आपल्या मनात येणारे शक्तिशाली विचार आणि भावना ताणाचाच एक नैसर्गिक व अपरिहार्य भाग असतात. परंतु जर आपण या विचारांना व भावनांना बळी पडलो, या विचारांच्या गळाला लागलो किंवा प्रेमात पडलो, भावनांत आकंठ बुडालो किंवा रूतलो तर समस्या उद्भवू शकतात. ताणातून उद्भवलेले कठीण विचार आणि नकारात्मक भावना यांच्या चक्रीवादळात आपण पुरते गुरफटून जातो.
एका क्षणी आपण आपल्या मुलांबरोबर खेळत असू आणि पुढच्या क्षणी नकारात्मक, कडवट, द्वेषमूलक व वाईट विचार आणि भावना यांनी वेढलेले असू. एका क्षणी आपण कुटुंबात एकत्रितपणे जेवणाचा आनंद घेत असू आणि दुसर्याच क्षणी आपण
संतप्त, भडक, मत्सरी व रागीट विचार आणि भावनांमध्ये अडकलेले असू. हे कठीण व नकारात्मक विचार आणि भावना आपल्यासाठी गळाचे काम करतात. या गळांमध्ये अडकल्यावर हे विचार आणि भावना आपल्याला आपल्या मूल्यांपासून दूर नेतात. मूल्ये म्हणजे आपल्या खोलवरच्या इच्छा व आकांक्षा असतात. अर्थात आपल्याला कशा प्रकारची व्यक्ती व्हायला आवडेल. आपल्याला प्रेमळ, ज्ञानी, लक्ष देणारी, वचनबद्ध, चिकाटी व सातत्य असणारी, जबाबदार, शांत, काळजी घेणारी, धैर्यवान व प्रामाणिक व्यक्ती म्हणवून घ्यायला नक्कीच आवडेल.
आपण स्वत:शी व इतर लोकांशी कसे वागू, सभोवतालच्या सध्यपरिस्थितीशी आणि भविष्यात येऊ शकणाऱ्या बदलांशी कसे समायोजन करू हे आपली मूल्ये ठरवतात. ताणतणावात व कठीण परिस्थितीत, आपले विचार आणि भावना आपल्यासाठी गळ टाकतात. त्या गळात अडकल्यावर तणावाचे विचार व भावना आपल्याला आपल्या मूल्यांपासून दूर खेचतात.
असे अनेक प्रकारचे कठीण विचार आणि भावना असतात, ज्यांच्या गळाचे तीक्ष्ण टोक आपल्याला ताणतणावाचे शिकार करू शकते.
हार मानण्याबद्दलचे विचार. उदा. “हे सर्व खूप कठीण आहे. मी आता सर्व सोडून देत आहे. मला आता हे जमणार नाही. आता विजय अशक्य आहे. मी हार मान्य करतो.”
इतरांना दोष देणारे विचार. उदा. “त्याने हे करायला नको होते. त्याची ही फार मोठी चूक आहे. त्याने माझ्याशी असे वागायला नको होते. त्याने मला असे बोलायला नको होते. त्याच्या चुकीमुळे हे सर्व घडले आहे.”
स्वतःबद्दल व इतरांबद्दल भयंकर व अन्यायकारक निकाल देणारे विचार. उदा. “मी मूर्ख आहे. मी कमकुवत आहे. तो वेडा आहे. तो मूर्ख आहे. मी नालायक आहे. मी अपयशी आहे. तो काळ्या जिभेचा आहे. माझं नशीब फुटकं आहे.”
आठवणी, विशेषत: भूतकाळातील कठीण प्रसंगांबद्दल व त्या प्रसंगामध्ये आलेल्या कडू वाईट अनुभवांबद्दल. उदा. “खूप प्रयत्न करूनही मला ते जमलं नाही. पाठीमागे मला हे जमलेच नाही. मागे यामध्ये मला खूप मोठे अपयश आले आहे. पाठीमागे याचा मला वाईट अनुभव आहे.”
भविष्याबद्दल विचार, विशेषतः आपल्याला वाटणाऱ्या भीतीबद्दल आणि भविष्यातील अनिश्चितता व असुरक्षितता याबद्दल. उदा. “उद्या माझे कसे होईल? माझ्या मुलाबाळांचे कसे होईल? आमची आर्थिक परिस्थिती नीट राहील का? आमच्या आरोग्याचं काय होईल? आम्ही जिवंत राहू का? आम्हाला कुठे आजार तर होणार नाही ना. आमचं काही बरंवाईट तर होणार नाही ना?”
जवळच्या व्यक्तींची व त्यांचे काही बरेवाईट व्हायची काळजी करणारे विचार. उदा. “तो ठीक असेल का? त्याला काही बरेवाईट तर होणार नाही ना? त्याचा एक्सीडेंट होणार नाही ना? त्याला कुठला आजार तर होणार नाही ना?त्याच्या जिवाचे काही बरेवाईट तर होणार नाही ना? त्याला कुणी फसवणार तर नाही ना?”
जेव्हा आपण ताणतणावात बुडतो, अडकतो किंवा रूततो तेव्हा आपले चालणं, बोलणं, बसणं, उठणं आणि वागणं सर्वच बदलते. आपण बर्याचदा अशा गोष्टी करू लागतो ज्या आपण वाईट, वर्ज्य, दर्जाहीन व मूल्यहिन समजतो. आपण लोकांबरोबर तर्कवितर्क, वादविवाद, भेदभाव व कदाचित भांडणही करू लागतो. आपण आपल्या मायेच्या, जवळच्या व प्रेमाच्या लोकांपासून माघार घेऊन दूर जाऊ लागतो. आपण आपला बराचसा वेळ अंथरुणावर थकून पडलेल्या व रुसून बसलेल्या अवस्थेत घालवू लागतो. आपण या वागण्याला “मार्ग बदललेले” वागणे किंवा “वाट चुकलेले” वागणे किंवा “भरकटलेले वागणे” म्हणतो. याचे कारण जेव्हा आपण या मार्गाने चालतो तेव्हा आपल्याकडून सतत आपली मूल्ये पायदळी तुडवली जातात. आपण आपल्या मूल्यांकडे जाणारे वर्तन करण्याऐवजी उलट मूल्यांपासून दूर दूर जाणारे वर्तन करीत असतो. आता अशा वेळी काय करावे? कसे वागावे? की जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणात आपल्या मूल्यांशी सुसंगत असे जीवन जगता येईल.
प्रथम आपल्याला एकाग्र कसे व्हायचे? व्यस्त कसे रहायचे? आणि अधिक चांगले लक्ष कसे द्यायचे? हे शिकावे लागेल. ही तंत्रे आपल्याला ताणतणाव व त्यामुळे होणाऱ्या परिणामांवर मात करण्यास मदत करतात. जेव्हा आपण तणावग्रस्त, भरकटलेले व वाट चुकलेले असतो तेव्हा आयुष्यात व्यस्त राहणे कठीण असते. व्यस्त असणे म्हणजे स्वतःला जीवनात गुंतवणे, अर्थात आपले पूर्ण लक्ष आयुष्यावर देणे. उदा. सरबत अथवा फळांचा रस पिताना आपण आपले पूर्ण लक्ष व ध्यान, त्याचा गंध, रंग आणि चव यावर देतो. आपण संगीत ऐकतो तेव्हा ते पूर्णपणे लक्ष देऊन ऐकतो. आपण आपल्या हातातल्या कामाकडे पूर्ण लक्ष व ध्यान देतो.
जेव्हा आपण विचार किंवा भावना यांच्या गळाला लागलेले असतो तेव्हा आपण विचलित झालेले असतो. जेव्हा आपण आपल्या हातातल्या कामाकडे लक्ष देतो, तेव्हा आपण केंद्रित असतो. जेव्हा विचार किंवा भावना यांनी आपल्याला झुकवलेले असतो तेव्हा आपण केंद्रित नसतो. जेव्हा आपण केंद्रित नसताना काही काम करतो तेव्हा ते बर्याचदा असमाधानकारक असते. त्यामुळे ताणतणावात असताना आपण स्वतःला काम करण्यास अक्षम आणि आनंद घेण्यास अपात्र ठरवून टाकतो.
म्हणून जर आपण “अधिक व्यस्त” रहायला शिकलो तर आणि “अधिक लक्ष केंद्रित” करू शकलो तर आपण ताणतणाव चांगल्या प्रकारे हाताळू शकतो. आपण आपले नातेसंबंध अधिक समाधानकारक ठेऊ शकतो आणि आपण महत्वाच्या गोष्टी चांगल्या दर्जाच्या करू शकतो. व्यस्त राहणे, स्वतःला गुंतवणे व ध्यान केंद्रित करणे हे आपण सरावाने शिकू शकतो.
उदा. आपण चहा किंवा कॉफी पित असताना आपले पूर्ण लक्ष त्यावर केंद्रित करावे. ते आपण अशा उत्सुकतेने प्यावे की आयुष्यात प्रथमच पित आहोत. आपण त्याचा रंग, चव व वास सावकाश घ्यावा. छोटे छोटे घोट घ्यावेत, चव जीभेवर रेंगाळू द्यावी.
जीभ व दात यामध्ये पेय थोडा वेळ धरावे आणि हळूहळू प्यावे. तापमान लक्षात घेत सावकाश गिळावे. गिळताना आपला घसा, जीभ व पडजीभ यांच्या हालचालींवर लक्ष केंद्रित करावे. अशा प्रकारे प्रत्येक घोट हळूहळू व सावकाश लक्ष व ध्यान देत प्यावा.
जेव्हा आपण विचारांनी व भावनांनी वेढलेले असू तेव्हा अशा प्रकारच्या अजून काय काय उपक्रमांचा आपण सराव करू शकतो ते शोधून काढावे.
पुनपुन्हा पाणी, चहा आणि काँफी व इतर पेय वरीलप्रमाणे पिण्याचा सराव करावा.
आपण कुटुंबातील व्यक्तींबरोबर किंवा मित्रांसोबत बोलत असतानाही याचा सराव करू शकतो. ते काय बोलत आहेत तिकडे लक्ष द्या. त्यांचा आवाज, बोलण्यातील चढ उतार व त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव पूर्ण ध्यान व लक्ष देऊन पहा.
मुलांबरोबर खेळ खेळणे व त्यांना वाचनकला व श्रवणकला शिकवणे यांतही आपण याचा सराव करू शकतो. आपण फक्त आपले संपूर्ण लक्ष मुले आणि खेळ यावर केंद्रित करावे. आपण गाडी, फरशी, कपडे इत्यादी धुताना याचा सराव करू शकतो. स्वयंपाक करणे किंवा घरातील कामे करणे याकडे आपण फक्त आपले पूर्ण लक्ष द्यावे. जेव्हा आपल्या लक्षात येईल की आपण ताणाच्या गळात अडकलेले आहोत तेव्हा त्यातून बाहेर पडण्यासाठी वरील गोष्टींवर लक्ष केंद्रित करावे व स्वतःला त्यात गुंतवूण टाकावे.
आपले विचार व भावना खूप कठीण व अवघड नसतील तेव्हा हा पर्याय खूप छान आहे. परंतु जर आपल्या भावना व विचार खूपच वेदनादायक व टोकाच्या असतील तर हा मार्ग उचित परिणाम देत नाही. कधीकधी कठीण व नकारात्मक भावना व विचार खूपच शक्तीशाली रूप धारण करतात व तीव्रतेने अनुभवास येतात, त्यांना “भावनिक वादळ ” असे म्हणतात. ते इतके बलवान असतात की ते एका शक्तिशाली वादळासारखे असतात आणि सहजपणे आपल्यावर मात करू शकतात. अशा वादळांना कशा पद्धतीने सामोरे जावे त्याविषयी आपण नंतर चर्चा करू.
डॉ. संताजी शेळके
मानसोपचारतज्ज्ञ
बारामती