वादळातील आसरा:

वादळातील आसरा:
कधीकधी आपल्या कठीण व नकारात्मक भावना आणि विचार खूपच शक्तीशाली रूप धारण करतात व तीव्रतेने अनुभवास येतात, त्यांना “भावनिक वादळ ” असे म्हणतात. ही वादळं इतकी बलवान असतात की ती एका शक्तिशाली वादळासारखी असतात आणि सहजपणे आपल्यावर मात करू शकतात. वेदनादायक, कडवट व दु:खद आठवणी, भविष्याची भीती व चिंता, दुर्बळ किंवा मूर्खपणाच्या विचारांचा पगडा यामुळे अशा वादळांचा उगम होतो. आपल्या बाबतीत लागू होणाऱ्या या विचार व भावनांना आपण शोधून ठेवले पाहिजे. राग, भीती, लोभ, व्यथा, अपराध, द्वेष व मत्सर या वेदनादायक भावना या भावनिक वादळाचा जोर वाढवतात. आपल्या अनुभवातील आपल्याला गळाला लावणाऱ्या व वादळं आणणाऱ्या आपल्या विचार व भावना यांना शोधून काढा.
या भावनिक वादळांत आपण आपला आपल्या जमीनीशी असलेला संपर्क द्रुढ कसा करावा हे शिकले पाहिजे. या वादळी परिस्थितीत आपण आपले पाय घट्ट जमीनीवर रोवून ठेवले पाहिजेत. अर्थात जमीनीशी असलेलं आपलं नातं अजून द्रुढ व व्रुद्धिंगत केलं पाहिजे. जमीनीवर येणं व पाय रोवणं म्हणजे आपण स्वतः नक्की काय करायचं ते समजून घेऊया.
कल्पना करा की आपण एका उंच झाडावर आहोत. अचानक वादळ सुरू होते. आपण झाडावर राहू इच्छिता? की झाडाखाली? की मोकळ्या जागेत जमीनीवर? झाडावर व झाडाखाली असताना, आपण मोठ्या संकटात असतो. आपल्याला झाडावरून खाली उतरण्याची आवश्यकता आहे. शक्य तितक्या लवकर मोकळ्या जागेत जमीनीच्या संपर्कात येण्याची किंवा जमीनीखाली राहण्याची आवश्यकता आहे. जमिनीवर आपण बरेच सुरक्षित असतो. आपण इतरांनाही मदत करू शकतो. उदा. सांत्वन देणे. आपण जमिनीवर आल्यावरच आपल्याला लपण्यासाठी सुरक्षित जागा शोधू शकतो व तिथे पोहोचू शकतो. म्हणून जेव्हा कधी भावनिक वादळे येताना दिसतात तेव्हा आपल्याला स्वतःला जमिनीवर येणे आवश्यक आहे. पण जमीनीवर यायचे म्हणजे नक्की काय करायचे?
सर्वात प्रथम आपण आपल्याला स्वतःला आत्ताच्या सभोवतालच्या जगात पूर्णपणे गुंतवून ठेवायचे. आपण जे काही काम करत आहोत त्यावर पूर्ण ध्यान व लक्ष केंद्रित करायचे. आपल्याला कसे वाटत आहे? कोणती भावना तीव्र आहे? आणि आपण काय विचार करत आहोत? आपण असा विचार का करीत आहोत? ते लक्षात घ्यायचे. त्या आत्म अवलोकनाच्या आधारे “भावनिक वादळ” येत असल्याची स्वतःला पूर्वकल्पना व जाणीव करून द्यायची.
पुढच्या पायरीवर आपले शरीर व शरीरक्रिया न्याहाळणे व त्यांच्याशी एकरूप होउन जाणे. भावनिक वादळ येत असल्याची पूर्वसूचना याच शरीर क्रिया आपल्याला देत असतात. छाती धडधडणे, गळा सुखणे, पोटात खड्डा पडणे, गुदमरणे, हातपाय लटलट कापणे, डोके भणभणणे इत्यादी शरीर लक्षणांवर लक्ष व ध्यान ठेवावे.
आता शरीर व या सर्व शरीर क्रिया हळूवार व शांत करण्यासाठी प्रयत्न करीत रहावे. आपल्या शरीराचा वेग हळूवार करावा. आपल्या श्वसनाचा वेग कमी करावा. आपली छाती व फुफ्फुसे श्वास सोडून पूर्णपणे रिकामे करावेत. मग शक्य तितक्या हळूवारपणे व शांतपणे श्वास घेऊन छाती भरून घ्यावी. सावकाश अंक मोजावे व त्याचा श्वासाशी मेळ करावा. पाच मोजत सावकाश श्वास आत घ्यावा, पाच मोजेपर्यंत श्वास धरून ठेवावा व पाच मोजत सावकाश श्वास सोडून द्यावा.
आपला उजवा पाय हळूहळू जमीनीवर पूर्ण ताकदीने दाबावा व मनातल्या मनात दहा मोजावे. त्यानंतर डावा पाय जमिनीवर पूर्ण ताकदीने दाबावा व मनात दहापर्यंत मोजावे. ही प्रक्रिया पाच वेळा दोन्ही बाजूंनी करावी.
हळू हळू आपले हात बाजूला पसरवा व हातांना ताण द्या. त्यानंतर आपल्या दोन्ही हातांनी नमस्कार करा व ते एकमेकांवर हळूहळू दाबा. पाच मोजेपर्यंत हातांनी दाब द्यावा नंतर पाच मोजत सावकाश दोन्ही हात बाजूला घ्यावेत. एक जोरदार व कडकडून आळोखा किंवा आळस दिला तरीही चालेल.
जमीनीवर येण्याची यापुढील पायरी म्हणजे आपल्या सभोवतालच्या जगावर आपले ध्यान व लक्ष केंद्रित करणे. आपण कुठे आहोत ते पहावे व आपण काय करत आहोत ते लक्षात घ्यावे. यासाठी आपल्याला आपल्या आजूबाजूला दिसत असणाऱ्या पाच ते सहा गोष्टींवर पूर्ण ध्यान व लक्ष द्यावे. आपल्याला आजूबाजूला ऐकू येत असणाऱ्या तीन ते चार गोष्टींवर लक्ष द्यावे. एक हळूवार व खोल श्वास घ्यावा. श्वासामध्ये कशाचा वास येतो आहे व तो कोठून येतो आहे ते शोधावे.
आपण कोठे आहोत हे पुन्हा एकदा लक्षात घ्यावे. आपल्या गुडघ्यांना किंवा पायांना किंवा गालांना हलकासा स्पर्श करावा. आपल्या आजूबाजूला असणाऱ्या कोणत्याही वस्तूला स्पर्श करावा. स्पर्श केल्यानंतर आपल्या बोटाखाली काय वाटते व जाणवते आहे त्याकडे संपूर्ण ध्यान द्यावे व ते लक्षात घ्यावे.
आठवणीत ठेवा की आपल्या मनात जसे नकारात्मक विचार आहेत आणि कठीण भावना आहेत, त्याचबरोबरीने आसपासचे जगही आहे जे आपण पाहू आणि ऐकू शकतो आणि ज्याचा स्पर्श, चव आणि वास लक्षात घेऊ शकतो. आपण आपले हात पाय आपल्याला हवे ते करण्यासाठी हलवू शकतो आणि आपलं तोंड आपल्याला पाहिजे ते बोलण्यासाठी वापरू शकतो. म्हणजे आपण वादळी परिस्थिती असताना सुद्धा आपल्या मूल्यांना अनुरूप अशीच कार्ये, कामे व वक्तव्ये करू शकतो.
वरील सर्व क्रिया व गोष्टी आपल्याला भावनिक वादळाच्या परीस्थितीत आपल्या जमीनीशी म्हणजे शरीर, शरीरक्रिया, मूल्ये व हातातल्या कामाशी बांधून ठेवतात. जमीनीवर आल्याने भावनिक वादळे अदृश्य अथवा गायब होत नाहीत. हे केवळ आपल्याला तोपर्यंत सुरक्षित ठेवते जोपर्यंत आपले भावनिक वादळ आपोआपच निघून जात नाही. काही वादळं बराच काळ टिकून राहतात तर काही पटकन निघून जातात.
जमीनीवर आसरा घेण्याचे आणि तिथेच टिकून राहण्यासाठीचे वरील सर्व व्यायाम व तंत्रे आपल्याला आपल्या कठीण विचार आणि भावना यांपासून मुक्त करणार नाहीत. आपल्याला आपल्या सध्याच्या आयुष्यात व्यस्त, ध्यानस्थ व गुंतवूण ठेवण्यास मदत करणे हा या सर्व व्यायामांचा हेतू आहे. उदा. कुटुंब, नातेवाईक आणि मित्रमंडळी यांकडे आपले पूर्ण लक्ष देण्यासाठी.
आपण ज्या मूल्यांच्या दिशेने जाऊ इच्छित आहे त्या दिशेने जाण्यासाठीही हे व्यायाम आपल्याला मदत करतात. आपण ज्या प्रकारची मूल्यवान व चांगली व्यक्ती बनू इच्छितो त्यासारखे वागण्यास व बोलण्यास मदत करण्यासाठी हे व्यायाम आहेत.
आपण आत्ता जे काही करत आहोत त्यावर लक्ष केंद्रित करण्यास मदत करण्यासाठी, जेणेकरून आपण ते काम उत्तम व दर्जेदार करू शकू यासाठी हे व्यायाम आहेत. आपण जेव्हा लक्ष केंद्रित करतो आणि व्यस्त असतो तेव्हा आपण ध्यान देऊन करीत असलेले काम आपल्याला अधिक समाधान देत असते. कंटाळवाणी व नावडती कामे करतांनादेखील जमीनीवर येण्याच्या पद्धती आपणास सर्वोत्तम परिणाम देतात.
अर्थात भावनिक वादळांदरम्यान आसरा घ्यावा तर कोणाचा? विध्वंस करणाऱ्या वादळाचा की आधार देणाऱ्या जमीनीचा. आपलं सर्वांचं उत्तर जमीनीचा आधार व आसरा हेच असणार आहे. चला तर मग आजपासून आपण भावनिक वादळांशी दोन हात करताना, जमीनीवर पाय घट्ट रोवून ठेवणाऱ्या सर्व पद्धतींचा दररोज वापर करून त्यात कुशल बनण्याचा प्रयत्न करीत राहू.
डॉ. संताजी शेळके
मानसोपचारतज्ज्ञ
बारामती

Leave a comment