नामकरण सोहळा:
भावनिक वादळांदरम्यान सराव कराव्यात अशा तीन पद्धती म्हणजे आयुष्यात गुंतलेले राहणे, आपल्या हातातल्या कामावर पूर्णपणे लक्ष व ध्यान केंद्रित करणे आणि दरम्यान स्वत:ला व शरीरक्रियांना जमीनीवर आणणे. यासाठी आपल्याकडे दोन प्रकारच्या चाली किंवा डाव असतात, पहिला मूल्यांच्या “दिशेने” नेणारा आणि दुसरा मूल्यांपासून “दूर” नेणारा. जेव्हा आपण कठीण व नकारात्मक विचार आणि भावनांमध्ये बुडतो, तेव्हा आपण आपल्या मूल्यांकडे दुर्लक्ष करून “मूल्यांपासून दूर ” नेणाऱ्या चाली व डावपेच निवडतो. उदा. आपण भांडणे, वादविवाद किंवा मतभेदांमध्ये अडकतो. आपण आपल्या प्रिय व आवडीच्या लोकांपासून दूर दूर राहू लागतो. आपण कदाचित थकून भागून पलंगावर तासनतास पडून राहतो व खूप वेळ वाया घालवू शकतो. म्हणून कठीण विचार आणि भावना यांपासून वेगळं होण्याची कला व कौशल्य जाणणे, शिकणे व सराव करणे खूपच गरजेचे आहे.
आपले आयुष्य जेव्हा खूप कठीण होते तेव्हा, हे कठीण विचार आणि भावना आपोआप निघून का जात नाहीत? असा प्रश्न आपल्याला पडतो. त्या लवकरात लवकर निघून जाव्यात असे आपल्यापैकी प्रत्येकाला वाटत असते.
पण आपण फक्त त्यांच्यापासून मुक्त होऊ शकतो असा विचार करणे वास्तववादी आहे का? आपण त्यांना कचर्यासारखे जाळू शकतो का? आपण त्यांना लपवून ठेऊ शकतो का?
आपण त्यांना एका खड्ड्यात पुरू शकतो का? आपण त्यांना बंद करू शकतो का? आपण त्यांच्यापासून दूर पळून जाऊ शकतो का? अर्थातच नाही.
आपले कठिण विचार व भावना याविषयी थोडा विचार करा व आपण आजतागायत वापरलेल्या सर्व मार्गांची उजळणी करा. बहुतेक लोक कठीण विचार व भावना याबाबत खालील सर्व किंवा काही धोरणे वापरतात: आरडाओरडा करणे, त्याबद्दल काहीसुद्धा विचार न करणे, संबंधीत लोकांना टाळणे, संबंधित ठिकाणे किंवा परिस्थिती टाळणे, अंथरुणावर पडून रहाणे, स्वत:ला अलग ठेवणे, गोष्ट सोडून देणे, मद्यपान करणे, तंबाखू किंवा गुटखा खाणे, अंमली पदार्थांचे सेवन करणे, तर्कवितर्क करीत वाद घालणे, इतरांना दोष देणे, दुसऱ्यांवर आरोप करणे, स्वत:वर टीका करणे इत्यादी.
नकारात्मक विचार व भावना यांपासून मुक्त करणारी आपली धोरणे, चाली, डाव व केलेले प्रयत्न लिहून काढा. यापैकी खूप पद्धतींमुळे विचार आणि भावना दूर जातात. पण ही स्थिती फक्त थोडाफार काळ राहते, आणि ते लवकरच परत येतात. परंतु यापैकी जवळजवळ सर्वच पद्धती आपल्याला आपल्या मूळ मूल्यांपासून व चांगल्या आदर्शांपासून दूर खेचून नेतात. म्हणून जेव्हा जेव्हा आपण आपल्या कठीण विचार आणि भावना यापासून सुटका करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आपले जीवन सहसा अजून वाईट अवस्थेत ढकलले जाते. म्हणून आज आपण एका नवीन पद्धती विषयी जाणून घेऊ या. कठीण विचार आणि भावना हाताळण्यासाठी आपल्याला एक नवीन मार्ग शिकायचा आहे. त्यांना दूर ढकलण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा किंवा त्यांपासून लांब पळण्यापेक्षा आपण त्यांच्याशी संघर्ष करणेच थांबवतो. जेव्हा जेव्हा आपण त्या विचार व भावनांच्या गळात अडकतो, तेव्हा आपण स्वतःहून त्या गळातून स्वत:ची सुटका करून घेतो.
सर्वात प्रथम आपल्याला आपले कठीण व नकारात्मक विचार आणि भावना ओळखायच्या आहेत. खालीलपैकी कोणकोणत्या विचार व भावनांच्या गळांमध्ये आपण वारंवार अडकतो ते शोधून, ते सर्व लिहून काढायचे आहे. उदा. भूतकाळात घडून गेलेल्या वाईट गोष्टी, भविष्यात घडू शकतील अशा वाईट गोष्टी, आपण पुरेसे चांगले नाही असे वाटणे, आपण कमकुवत, वेडे किंवा वाईट आहोत असे वाटणे, इत्यादी. कोणकोणत्या शारीरिक भावनांच्या गळात आपण नेहमी अडकतो तेही शोधून काढावे. या भावना शरीरात नेमक्या कोठे जाणवतात ते चित्र काढून त्यात चिन्हांकित करायचे. प्रथम आपण लक्षात घ्यावे की एखाद्या विचाराने किंवा भावनेने आपल्याला आकर्षित केले आहे व आपण त्यांच्या गळात अडकू शकतो किंवा अडकलो आहोत. मग आपण त्यांना नाव द्यायचे. त्यांचे नाव सांगण्यासाठी आपण शांतपणे स्वत:ला त्याबद्दल काहीतरी सांगतो. उदा. येथे माझ्या छातीमध्ये घट्ट व जड होत आहे, येथे माझ्या कपाळावर दबाव व ठणक येत आहे, येथे एक वेदनादायक व कडवट आठवण आहे, येथे भविष्याबद्दल चिंता व भीती आहे, येथे भूतकाळाबद्दल एक कठीण विचार व भावना आहे, येथे राग, चीड व द्वेष आहे, येथे माझ्या कुटुंबाविषयी एक कठीण विचार व भावना आहे इत्यादी.
नामकरण प्रक्रिया साधारणपणे “हा एक विचार आहे” किंवा “ही एक भावना आहे” असे शांतपणे स्वत:ला सांगून सुरू होते. तथापि, जर आपण “माझ्या लक्षात येत आहे की किंवा मला जाणीव होत आहे की किंवा माझ्या ध्यानात आलं आहे की” हा शब्दप्रयोग सुरुवातीला जोडला तर आपण कठीण विचार व भावना यांच्या गळामध्ये अडकत नाही. आधीच गळात अडकले असल्यास आपण लगेचच स्वतःची सुटका करून घेऊ शकतो. आता हा वाक्यप्रयोग वापरून पाहू आणि काय फरक पडतो ते पाहू. उदा. माझ्या लक्षात येत आहे की माझ्या छातीमध्ये जडपणा व घट्टपणा आहे, माझ्या ध्यानात आले आहे की ही एक वेदनादायक व कडवट अशी आठवण आहे, मला लक्षात आले आहे की हा राग, द्वेष व चीड आहे, मला लक्षात आले आहे की हा पोटात पडलेला खड्डा आहे, माझ्या लक्षात आले आहे की हा एक भीतीदायक व घाबरवणारा विचार आहे, इत्यादी. आपल्यासमोर जे जे विचार व भावना येतील किंवा उभ्या राहतील त्यांना लक्षात व ध्यानात घ्यावे आणि एक नाव द्यावे. लक्षात किंवा ध्यानात घेणे आणि नामकरण करणे आपल्याला मदत करते. कठीण विचार आणि भावना आपल्याला आपल्या नकळत किंवा माहिती नसताना त्यांच्या गळात अडकवतात. एक क्षण आपण आपल्या मित्रांशी बोलत असतो, त्यात आवड व रस दाखवत असतो, तर पुढच्याच क्षणी आकस्मिकपणे आपण कठीण विचारांच्या गळाला लागलेले असतो. अचानक आपण आपल्या मित्रांचे यापुढील बोलणे ऐकत नाही. आपण अद्याप आपल्या मित्रांसोबतच असतो पण संभाषणात खरोखर आपले लक्ष व ध्यान नसते. आपण मित्रांच्या संभाषणात व त्या प्रसंगात व्यस्त व गुंतलेले नसतो. आपण केवळ अर्धच व अपुरं ऐकत असतो. आपण आपले पूर्ण लक्ष व ध्यान मित्राकडे देत नसतो. याचं कारण म्हणजे आपण आपल्या विचारांच्या किंवा भावनांच्या टोकदार गळांमध्ये अडकलेले असतो. अशा परिस्थितीत वापरायचा प्रथम चरण म्हणजे आपण गळाच्या आकड्यामध्ये पुरते अडकले गेलेलो आहोत याची नोंद घेणे व ते समजून घेणे. दुसरे चरण म्हणजे ज्या कठीण विचार व भावनांमध्ये आपण अडकले आहोत त्याला नाव देणे. आता तिसऱ्या चरणामध्ये आपण शांतपणे स्वतःला सांगायचे की, “माझ्या लक्षात आले आहे की मला माझ्या कडवट आठवणींनी अडचणीत आणले आहे”. “माझ्या ध्यानात आले आहे की येथे एक कठीण विचार आहे.” “मी लक्षात घेत आहे की माझ्या छातीमध्ये जड वाटत आहे”. “माझ्या लक्षात येत आहे कीमाझ्या घशात वेदनादायक भावना जाणवत आहेत”. इत्यादी
यापुढील चौथे चरण म्हणजे आपण जे काय करीत आहात त्यावर लक्ष व ध्यान रिफोकस करणे. आपण स्वयंपाक, खाणे, खेळणे, धुणे, वाचणे, लिहिणे, मित्रांसह गप्पा मारणे किंवा जी काही क्रिया अथवा काम करत असेल त्यामध्ये पूर्णपणे गुंतून जाणे, त्याकडे संपूर्ण लक्ष व ध्यान देणे.
आपण प्रत्येक वेळी कठीण विचार व भावना यांच्या गळात अडकल्यावर वरील चार चरण वापरू शकतो. “आपण लक्षात घेतो की, या आपल्या कुटुंबीयांबाबत रागाच्या भावना आहेत”. जरी आपल्याकडे कुटुंबाबद्दल रागाची भावना आहे, तरी आपण कुटुंबाची “काळजी घेण्याच्या” आपल्या मूल्यांवर कार्य करणे आपण निवडणार आहोत व आपल्या कुटुंबातील सर्वांची “काळजी घेण्यात” आपण स्वतःला गुंतवणार आहोत.
“आपण लक्षात घेतो व ध्यान देतो की येथे आपल्या मुलांबद्दल एक कठीण विचार आहे.” आणि हा कठीण विचार असतानासुद्धा, आपण आपल्या “पालक असण्याच्या मूल्यांवर” कार्य करायचे निवडतो. आपण आपल्या मुलांकडे “लक्ष देणारी आणि त्यांची काळजी घेणारी” वाक्ये बोलतो व तशीच क्रुतीही करतो.
आपण या चरणांचा जितका जास्त सराव करू तितके आपण यात कुशल बनत जाऊ. आपण आपल्या दैनंदिन कामकाज व दिनक्रम यांमध्ये याचा पुन्हा पुन्हा सराव करू शकतो. प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा आपल्या लक्षात व ध्यानात आले असेल की आपण कठीण व नकारात्मक विचार व भावना यांच्या गळात अडकलो आहोत तेव्हा तेव्हा या चरणांचा सराव करू शकतो.
जेव्हा आपण तणावग्रस्त स्थितीत असतो तेव्हा कठीण व नकारात्मक विचार आणि भावना असणे हे नैसर्गिक, स्वाभाविक व अपरिहार्य आहे. प्रत्येकाच्या बाबतीत हेच घडते, आणि याला कोणीही अपवाद नाही. आपले हे कठीण विचार व भावना यांना लक्षात व ध्यानात आणण्याचे व त्यांना ओळखून नाव देण्याचे बरेच मार्ग आहेत. उदा. येथे अमुक बद्दलचा विचार आहे, येथे अमुक बद्दलच्या आठवणी आहेत, मला लक्षात आले आहे की येथे दु:ख ही भावना आहे, मला लक्षात आले आहे की माझ्या छातीत जडपणाची भावना आहे, माझ्या लक्षात आले आहे की माझ्या पोटात खड्डा पडल्याची व घाबरून गेल्याची भावना निर्माण झाली आहे इत्यादी.
अशा प्रकारे आपण आपले कठीण विचार व भावना ओळखून, त्या लक्षात व ध्यानात घेतल्यानंतर, आणि त्यांना यथायोग्य नावे दिल्यानंतर, आपले अर्धे काम पूर्ण होते. यानंतर आपण आपल्या सध्याच्या सभोवतालच्या जगावर आपले विचार व भावना आपल्या मूल्यांना व आदर्शांना धरून केंद्रित करू शकतो. यासाठी आपण आपली पाचही इंद्रिये सभोवतालच्या जगातील आत्ताचं सध्य वातावरण पाहणे, ध्यान देऊन ऐकणे, गंध जाणणे, चव लक्षात घेणे व स्पर्श अनुभवणे या कामात व्यस्त करून टाकतो. आपण हे करू शकतो हे लक्षात आल्यावर आपण आयुष्यात व आयुष्याबद्दलही उत्साही होतो.
काहि लोक या कौशल्याचा सराव करणे विसरून जातात. अशावेळी या कौशल्यांचा नियमितपणे अभ्यास करण्यासाठी ठराविक वेळ बाजूला काढून ठेवू शकतात. उदा. रात्री झोपण्यापूर्वी किंवा सकाळी उठल्यावर, जेवणाच्या अगोदर किंवा नंतर, आंघोळीच्या दरम्यान, इत्यादी. ठराविक ठिकाणी या विचारांचा आपण सराव करू शकतो. उदा. ध्यान करताना, प्रवासात असताना, रांगेत उभे असताना, इत्यादी.
जेव्हा आपण खोटे बोलत असल्याचे व आपल्याला रात्री झोपही नीट येत नसल्याचे आपल्या लक्षात येते तेव्हा हळूवारपणे या कौशल्याचा सराव सुरु करावा आणि आपल्या शरीराशी व सभोवतालच्या जगाशी एकरूप होण्याचा सराव करावा.
काही वेळा आपल्याला खूपच थकल्यासारखे वाटू शकते. काही वेळा आपण खूप दु: खी, घाबरलेले किंवा रागावलेले असू शकतो. कदाचित आपण “काय फरक पडतो” म्हणून स्वतःला त्रास देऊ इच्छित नाही. “हे सर्व अगदी फालतू व निरुपयोगी आहे” असेही आपल्याला वाटू शकते. म्हणून नेहमी स्वतःला स्मरण करून द्यावे की हे एक नवीन भाषा शिकण्यासारखे आहे व याला खूप सराव करावा लागतो.
आपल्या नकारात्मक, असह्य व कठीण भावना व विचारांमुळेही आपण वाकले जाऊ शकतो. उदा. हे सर्व मूर्खपणाचे आहे! ते महत्त्वाचे नाही! हे काही मदत करणार नाही! मला व्यवसाय व काम धंदा देखील आहे! त्यात काहीही तथ्य नाही! हे वेळ वाया घालवण्याचे काम आहे! मी हे करू शकत नाही! इत्यादी. आपण या विचारांच्या व भावनांच्या गळाच्या आकड्यात अडकले आहात हे लक्षात व ध्यानात घ्या. त्यांना लक्षात घ्या, नाव द्या व व्यस्त होऊन जा. प्रत्येक लहान सहान सरावाने आपण स्वतःमध्ये एक सकारात्मक बदल घडवून आणाल.
प्रत्येक वेळी जेंव्हा जेंव्हा आपण सराव करतो, तेव्हा तेव्हा आपण आपल्या मूल्यांची काळजी घेत असतो व मूल्यवर्धित काम करत असतो. दिवसेंदिवस आपण आपल्या मूल्यांच्या व मूळ आदर्श स्वरूपाच्या जास्तीत जास्त जवळ आणि मायावी व नकली रूपापासून तसेच ताणतणावापासून जास्तीत जास्त दूर जायला सुरुवात करतो. आपण एक आदर्श व मूल्यवान व्यक्ती घडवायला सुरुवात करतो.
डॉ. संताजी शेळके
मानसोपचारतज्ज्ञ
बारामती