मूल्य अधिष्ठान:

मूल्य अधिष्ठान:
आपण कशा प्रकारचा माणूस असणे इच्छित आहोत; आपण स्वत:ला, इतरांना आणि आपल्या सभोवताली असणाऱ्या जगाला कशा प्रकारे वागवू इच्छित आहोत हे सर्व आपली मूल्ये ठरवतात.
आपली मूल्ये व आपली ध्येये उद्दिष्टे समान नसतात. आपण काय काय मिळविण्यासाठी इच्छा व प्रयत्न करीत आहोत, हे आपली ध्येये ठरवतात. आपण काय प्रतीची व कशा प्रतवारीची व्यक्ती बनण्यासाठी इच्छा व प्रयत्न करीत आहोत, हे आपली मूल्ये ठरवतात.
समजा नोकरी मिळविणे हे आपले ध्येय आहे ज्यामुळे आपण आपल्या प्रियजनांची व कुटुंबीयांची काळजी घेऊ शकू व त्यांना व त्यांच्या स्वप्नांना आधार व समर्थन देऊ शकू. आणि समजा आपली मूल्ये आपले कुटुंब, मित्र किंवा आपल्या सभोवतालचे लोक यांच्याशी दयाळुपणाने वागणे, काळजी घेणे, प्रेमळ असणे आणि आधार देणे ही असतील. आणि समजा नोकरी मिळवणे हे आपले ध्येय पूर्ण झाले नाही, तरीही आपण आपले कुटुंबीय, मित्रमंडळी आणि आपल्या सभोवतालच्या लोकांशी दयाळूपणाने वागणे, काळजी घेणे, प्रेमळ असणे आणि आधार देणे या मूल्यांप्रमाणे नक्कीच राहू शकतो.
जरी आपण अगदी कठीण परिस्थितीत असेल, आपल्या कुटुंबापासून विभक्त असेल आणि अत्यंत बिकट परिस्थितीला तोंड देत असेल, तरी आपण काळजी घेणारी, प्रेमळ व आधार देणारी आणि दयाळूपणे वागण्याची आपली मूल्ये जगू शकतो. आपल्या दैनंदिन व्यवहारात या मूल्यांवर कार्य करण्याचे थोडे थोडे मार्ग व पद्धती आपण शोधू शकतो. आत्ताच्या घडीला आपली अनेक ध्येये, स्वप्ने व उद्दिष्टे ही अशक्य व अगम्य असू शकतात परंतु आपल्या सभोवतालच्या लोकांशी आपल्या मूल्यांनुसार व्यवहार करण्याचे मार्ग नेहमीच आपल्यासमोर असतात व ते आपण शोधूही शकतो.
आपण आपल्या कृतीद्वारे, आपल्या सभोवतालच्या जगावर परिणाम करीत असतो. आपली कृती म्हणजे आपण आपले हातापायाने काय करतोय आणि आपल्या तोंडाने काय म्हणतोय यांची गोळाबेरीज. आपण आपल्या स्वतःच्या कृतींवर जितके अधिक लक्ष केंद्रित करू तितके आपण आपल्या सभोवतालच्या जगावर, दररोज भेटणार्या लोकांवर आणि परिस्थितीवर अधिक प्रभाव टाकू शकू. आपण वाद घालणे थांबवू शकतो व आपल्या मूल्यांवर व आदर्शांवर कार्य करू शकतो. आपण आपल्या कृतीद्वारे आपल्या आजूबाजूच्या लोकांना प्रभावित करू शकतो.
आपल्या कृती आपल्या मूल्यांचे समर्थन करतात का? आपल्या कृती आपल्याला आपल्या मूल्यांजवळ नेतात किंवा मूल्यांपासून दूर नेतात? हे प्रश्न स्वतःला नेहमी विचारत राहणे आवश्यक आहे. आपली मूल्ये ठरवताना ती सुरुवातीला सामान्य व योग्य मूल्ये असावीत. उदा. दयाळू असणे, काळजी घेणारे असणे, उदार असणे, सहकार्य करणारे असणे, मदत करणारे असणे, धीर धरणारे असणे, जबाबदार असणे, संरक्षणात्मक असणे, शिस्तबद्ध असणे, मेहनती असणे, वचनबद्ध असणे, शूर असणे, चिकाटीने राहणारे असणे, क्षमा करणारे असणे, कृतज्ञता बाळगणारे असणे, निष्ठावान असणे, आदरणीय असणे, आदर करणारे असणे, विश्वासार्ह असणे, निष्पक्ष असणे, न्याय्य असणे इत्यादी.
तीन किंवा चार सामान्य मूल्ये निवडावीत जी आपल्याला सर्वात जास्त महत्वाची वाटतात आणि त्यांना नोंदवहीमध्ये लिहून ठेवावे. आपल्या समाजातील आपल्या रोल मॉडेलचाही विचार करावा ज्यांच्यासारखे बनण्याची आपली इच्छा असते. ही व्यक्ती असं काय म्हणते किंवा करते ज्याची आपण प्रशंसा करतो तेही लिहून ठेवावे. त्याच्या किंवा तिच्या कृतीतून ती व्यक्ती कोणकोणत्या मूल्यांचे प्रात्यक्षिक करत असते ते लिहावे. ही व्यक्ती इतरांना कशा प्रकारे आदरणीय व प्रशंसनीय वागणूक देते ते पहावे, व लिहून ठेवावे. आपल्या आजूबाजूच्या लोकांशी वागताना आपण कोणत्या पद्धतीने वागू इच्छिता व त्यानुसार आपण कोणती मूल्ये जगू इच्छिता ते स्पष्ट लिहून काढा.
नातेसंबंधांमध्ये आपण आपल्या मूल्यांनुसार वागू शकतो किंवा मूल्यांच्या विरुद्ध. आपली मूल्येसुद्धा दोन्ही मार्गांनी जातात: स्वतःकडे आणि इतरांकडेही. म्हणून जर आपली मूल्ये काळजी घेणे व आधार देणे ही असतील तर मग या मूल्यांप्रमाणेच आपण स्वतःशी आणि इतरांशी वागायचं आहे. हे महत्त्वाचे आहे कारण आपण जर स्वतःची देखभाल करत नसेल तर मग इतरांची काळजी घेणे आपल्यासाठी खूपच कठीण होईल.
आता आपली मूल्ये आपल्या क्रुतीत व वागण्यात उतरवण्याची वेळ आली आहे. एक महत्त्वपूर्ण नातेसंबंध व नातेवाईक निवडा; ज्याला आपण नियमितपणे भेटत असतो, जो आपल्यासाठी महत्त्वाचा असतो व ज्याची आपल्याला काळजी असते. उदा. आई, वडील, भाऊ, बहीण, बायको, मुलगा, मुलगी, सासू, सासरा इत्यादी. या नात्यातून आपल्याला कोणती मूल्ये जगायची आहेत ते ठरवा. उदा. आपल्या मुलांशी वागताना दयाळू असणे व जबाबदार असणे ही जर आपली मूल्ये असतील तर मग त्या मूल्यांप्रती एक लहान पाऊल म्हणजे आपल्या मुलांसोबत दररोज 10 मिनिटे खेळणे किंवा वाचणे हे असू शकेल. जर आपण एका नातेवाईकांना निवडले आणि कृतज्ञ असणे व मैत्रीपूर्ण असणे ही आपली मूल्ये असतील तर यावर कार्य करण्यासाठी आपण त्यांना धन्यवाद देऊ शकेल. अगदी किरकोळ अशा मदतीसाठी आपण त्या व्यक्तीस हार्दिक शुभेच्छा देणे आणि कृतज्ञता व्यक्त करणे हे एक लहानसे पाऊल उचलू शकतो. अगदी अत्यंत कठीण परिस्थितीतही आपण आपल्या मूल्यांनुसार जगण्यासाठी लहान लहान क्रिया करू शकतो. जेव्हा आपण आपल्या मूल्यांवर कार्य करतो तेव्हा आपण अधिक समाधानकारक आणि परिपूर्ण जीवन जगायला लागतो. यासाठी आता आपण आपली कृती योजना तयार करायची.
आपल्या मूल्यांवर कार्य करण्यासाठी आपण या आठवड्यात काय काय कृती करायच्या आहेत? आपण आपल्या तोंडाने काय व कसे बोलायचे आहे? आपण आपल्या हातापायांनी काय व कसे करायचे आहे? जे वास्तवाला धरून वाटते असे काहीतरी निवडावे. जर आपली योजना फारच अवघड वाटत असेल तर व आपण ते करू शकतो असा आपल्याला विश्वास नसेल तर काहीतरी सोपे आणि लहान निवडावे.
आपल्या मूल्यांनुसार जगल्यामुळे आपल्या आयुष्याला अर्थ किंवा हेतू प्राप्त होतो. आपण एक चांगली व आदर्श व्यक्ती बनू शकतो जी आपली इच्छा असते. आता लक्षात घ्या व आठवा की अवघड विचार आणि भावना आपल्याला हुकल्यासारखे व मूर्खपणाने वागायला भाग पाडतात. आपल्याला आपल्या मूल्यांनुसार वागण्यास व आपल्या कृती योजनेचे अनुसरण करण्यास बाधा आणतात. बर्‍याचदा आपण कृती करण्याबद्दल विचार करण्यास सुरवात करताच, कठीण विचार आणि भावना प्रकट होतात आणि आपल्याला सहज भरकटवून टाकतात व आपली बुद्धी भ्रष्ट करून टाकतात.
दिवस सुरू करताना इच्छित दोन किंवा तीन मूल्ये जगण्याचे व वागण्याचे लक्ष्य ठेवायचे. आपण अंथरूणावर असताना किंवा उठताना त्या मूल्यांची मनात उजळणी करायची. दिवसभर या मूल्यांवर कार्य करण्याचे व त्यानुसार वागण्याचे मार्ग शोधत रहायचे. अगदी लहानात लहान कृती महत्त्वाची असते कारण हजारो मैलांचा प्रवास एका पावलाने सुरू होतो. प्रत्येक वेळी जेव्हा आपण आपल्या मूल्यांवर कार्य करतो, आपल्या मूल्यांनुसार वागतो तेव्हा आपण इच्छित क्रुती व अभिनय करीत असतो. आपल्या मूल्यांनुसार वर्तन करून आपण स्वतःस जाणून घेत असतो जे जगातील सर्वात मोठे व मौलिक काम आहे.
आपल्याला वागताना व जगताना खूप समस्या व अडचणी असतात, परंतु कोणत्याही कठीण परिस्थितीवर मात करण्यासाठी आपल्याकडे तीन पर्याय असतात. पहिला पर्याय म्हणजे शक्य असल्यास ती गोष्ट सोडून देणे. दुसरा पर्याय म्हणजे जे आपण बदलू शकतो ते बदलणे आणि जे आपण बदलू शकत नाही त्याचा स्वीकार करणे आणि हे सर्व करताना आपल्या मूल्यांनुसार जगणे. तिसरा पर्याय म्हणजे हार मानणे व आपल्या मूल्यांपासून दूर जाणे.
जेव्हा कधी आपण सोडून देऊ शकत नाही, तेव्हा आपण दुसरा पर्याय निवडला पाहिजे कारण आपली मूल्ये ही आपल्यासाठी महत्वाची असतात.
अर्थात आपण जे काय बदलू शकतो ते बदलायचे, बदलू शकत नाही त्याला स्वीकारायचे आणि नेहमीच आपल्या मूल्यांनुसार जगायचे. आपल्या हातापायाचा आणि तोंडाचा वापर कृती करण्यासाठी करायचा. परिस्थिती सुधारण्यासाठी आपण जे काही करू शकतो ते कितीही लहान व नगण्य असले तरीही करायचे. शेवटी जे आपण बदलूच शकत नाही ते स्वीकार करायचे. हे करताना बरेच कठीण विचार आणि भावना येतील. जेव्हा आपण अशा कठीण परिस्थितींचा सामना करतो तेव्हा नकारात्मक भावना प्रकट होतात. अशा कठीण भावना विचार येणे अगदी नैसर्गिक आहे. अशावेळी आपण स्वतःला जमीनीवर आणण्यासाठी सभोवतालच्या वातावरणात स्वतःच्या इंद्रियांना व्यस्त करून टाकायचे आणि आपल्या आधीच ठरवलेल्या मूल्यांनुसार जगायला व वागायला सुरुवात करायची. अर्थात जर आपण परिस्थिती सुधारण्यासाठी काहीही करू शकत नसेल तर आपण आपल्या मूल्यांनुसार जगण्याचे इतर मार्ग शोधायला सुरुवात करायची.
“आपण जे काय बदलू शकतो ते बदलायचे, बदलू शकत नाही त्याला स्वीकारायचे आणि नेहमीच आपल्या मूल्यांनुसार जगायचे”, हे वाक्य आपल्या स्मृतीत कायमस्वरूपी वचनबद्ध करायचे. आपल्या दैनंदिन समस्या व अडचणींशी लढताना व आयुष्याशी सौदा करताना त्या वचनांचा वापर करायचा. मूल्यशिक्षीत, मूल्याधिष्ठित व मूल्यवान व्यक्ती बनण्याची ही सुरुवात असेल. उत्कृष्ट मूल्ये ही पुढील पायरी असेल तर सर्वोत्कृष्ट मूल्ये ही अंतिम पायरी असेल.
डॉ. संताजी शेळके
मानसोपचारतज्ज्ञ
बारामती

Leave a comment