नशीब: थांबा
“यशस्वी व थोर लोक नशीबवान असतात” यावर आपण किती भरवसा ठेवतो? खूपच जास्त. इतका की नशीबासमोर तीव्र इच्छा, पूर्वनियोजन, योजना, कष्ट, सहयोग, सहकार्य, सद्सद्विवेक व मनोभूमिका या गोष्टी आपण नगण्यच समजतो. कार्यकारणभाव पूर्णपणे कानाआड करतो. यशस्वी लोक घराबाहेर, जाहिरातीत व जनमानसात काय बोलतात व करतात? यावर आपले लक्ष केंद्रित करतो. ते वापरणारे कपडे, घरगुती वस्तू, पेयं, गोळ्या, खाद्यपदार्थ, साबणं, क्रीम्स आपणही वापरायला सुरुवात करतो. ज्या देवावर ते श्रद्धा ठेवतात, ज्या बाबाजींना ते भेटतात, जो गंडादोरा, धागा, टिळा ते लावतात ते सर्व आपणही करायला सुरुवात करतो. परंतु हेच यशस्वी लोक ज्या तीव्र इच्छेने पूर्वनियोजन, योजना व कष्ट करतात ते आपण विसरून जातो. त्यांचे सहयोग, सहकार्य, सद्सद्विवेक व सकारात्मक मनोभूमिका व द्रुष्टीकोन यांकडे आपण ढुंकूनही पाहत नाही. आपणही एकमेकांना परीक्षेपूर्वी “बेस्ट लक” देतो, जणू सर्वकाही लकच्याच हातात आहे. परंतु यशाची पार्श्वभूमी व खुद्द यश ठरवणाऱ्या तीव्र इच्छा, पूर्वनियोजन, योजना, कष्ट, सहयोग, सहकार्य, सद्सद्विवेक व मनोभूमिका या गोष्टी नजरेआड करतो. म्हणून नशीबावर हवाला ठेवण्याआधी व नशीबाला दोष देण्याआधी तीव्र इच्छा, पूर्वनियोजन, योजना, कष्ट, सहयोग, सहकार्य, सद्सद्विवेक, मनोभूमिका व सकारात्मक द्रुष्टीकोन या गोष्टींची नक्कीच आठवण करा.