मनाचा लॉकडाऊन:
कोरोना या रोगाने आपल्याला लॉकडाऊन किंवा टाळाबंदी हा सुंदर शब्द दिला आहे. आज आपण संपूर्ण देशात कोरोना प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन चा प्रभावी वापर करीत आहोत. त्यामुळे आज रुग्णसंख्या आटोक्यात राहून आपल्या देशाचे आरोग्य अबाधित राहिले आहे.
लॉकडाऊन ही संकल्पना मनाच्या आरोग्यासाठी महत्त्वाची आहे. आयुष्यात व जीवनप्रवासात अचानक उद्भवणाऱ्या आणीबाणीच्या काळात ही संकल्पना उपयोगी आहे. जेव्हा या काळात आपल्या भावना व विचार आपल्यावर स्वार होतात तेव्हा लॉकडाऊन गरजेचे असते. यामध्ये एकांत, चिंतन, मनन व सिंहवलोकन यांचा समावेश होतो.
आपण बालपणी एक गोष्ट नेहमी ऐकत असू. एका अतिशय दुःखात व गरिबीत असलेल्या भिकाऱ्याला एकदा देव प्रसन्न होतो. देव काय हवे ते, मागण्यास सांगतो. भिकारी खूप विचार करून, झोळी भरून सोन्याची नाणी मागतो. देव म्हणतो झोळी भरली की मला सांग कारण झोळीबाहेर पडलेली सर्व नाणी माती होणार आहेत. भिकार्याने मान्य केले पण प्रत्यक्ष झोळी भरली तरीही त्याचे समाधान होत नाही. त्याला लोभ सुटतो. तो अजून मागतो, अजून मागतो व शेवटी त्याची झोळी फाटते. आणि सर्व नाणी जमिनीवर पडून त्याची माती होते.
आपली सर्वांची अवस्था एक ना एक दिवस एका किंवा दुसऱ्या बाबतीत याच भिकाऱ्यासारखी होते. प्रत्येकाच्या झोळीचं स्वरूप व मागणीचा प्रकार वेगवेगळा असेल. आपली झोळी भरलेली असते, पण आपण थांबत नाही. आपली झोळीही आपण बदलत नाही व आपली मागणीही बदलत नाही. आपण अजून, आणखी व जास्त मागत जातो आणि शेवटी आपल्या आयुष्यात “होत्याचं नव्हतं झालं” अशी अवस्था येते.
कोरोना संकट हे निसर्गाच्या व्यवस्थेत मानवी हस्तक्षेप व त्याचा अतिरेक यामुळे आलेलं आहे. तसेच मनातील नकारात्मक भावभावनांच्या व स्वार्थी विचारांच्या अतिरेकामुळे आयुष्यात “होत्याचं नव्हतं” ही अवस्था येते. हे टाळण्यासाठी किंवा यावर मात करण्यासाठी आपण लॉकडाऊन या संकल्पनेचा वापर करू शकतो.
लॉकडाऊन दरम्यान जसं आपण आपल्या घरातच राहिलो त्या प्रमाणे मनाच्या लॉकडाऊनमध्ये आपल्या मनाला आपल्या अंतर्मनात म्हणजे घरात ठेवायचं आहे. अर्थात आपण अंतर्मुख होऊन आत्मावलोकन व आत्मनिरीक्षण करायचं आहे. आपण जाणीवपूर्वक स्वतःबद्दल काही प्रश्न करायचे आहेत. त्याची उत्तरे डोळे न उघडता, बाहेर न बघता, बाहेरचं न ऐकता आपल्या आतच शोधायची आहेत. जसं
आता मी काय विचार करत आहे?
व तो का करत आहे?
हा विचार कुठून आला आहे?
आता माझ्या मनाला कसे वाटत आहे?
काय भावना आहे?
ती कुठून आली आहे?
का आली आहे?
या प्रश्नांची उत्तरे खरीखुरी व प्रामाणिकपणे द्या. जाणीवपूर्वक शोध घ्या की राग, लोभ, मोह, मत्सर, तिरस्कार व अहंकार यांसारखे काही विचार व भावभावना आहेत काय? आढळल्यास सावध व्हा, घाबरू नका, दोष देऊ नका, समर्थन करु नका. असे काही सापडल्यास मनामध्ये तातडीने आणीबाणी व लॉकडाऊन जाहीर करा. आणीबाणीदरम्यान काहीही उक्ती व क्रुती करणे टाळा. नेहमीच्या व स्वतःला दुर्बळ व सिमीत करण्यात मदत करणाऱ्या विचारांना टाळा लावा व त्यावर अंमल न करण्याचा निश्चय करा.
काम, शिक्षण, सहकारी, वरिष्ठ, मित्र, नातेवाईक व शेजारी या सर्वांबाबतीत प्रेम, माया, दया, करूणा व बंधुत्व या भावना व विचार नैहमी लक्षात ठेवा. या भावनांना जपण्याची प्रतिज्ञा करा व त्या बाबतीत नेहमी जागरूक व सावध रहा. या बाबतीत भूतकाळात घडून गेलेल्या दुखद प्रसंगाला व कडू अनुभवाला, धडा किंवा बोध देणारे गुरु समजा. धडा व बोध यांवर ध्यान द्या.
नियम व कायदे उल्लंघन करण्याचे विचार व भावना निर्माण झाल्यास. एखाद्याच्या मानवी हक्कांची पायमल्ली करण्याची गुर्मी आल्यास. तुमच्यावर आर्थिक, शारीरिक व मानसिकरित्या अवलंबून असलेल्या लहानथोरांवर अन्याय व दुर्लक्ष करावेसे वाटल्यास. सहचारिणीला तीच्या इच्छेविरुद्ध तुमच्या इच्छेनुसार वळवावे व वागवावे वाटल्यास. रस्त्यावर रहदारीचे नियम धाब्यावर बसवून वाहन चालवावे वाटल्यास. एखाद्याला सामाजिक, मानसिक व शारीरिक ईजा करण्याची दुर्बुद्धी आल्यास. स्वतःचे काही बरेवाईट करावे, क्विट करावे किंवा जीवन संपवावे वाटल्यास. ताबडतोब व कडक लॉकडाऊन व टाळाबंदी लागू करा, स्वतः होम क्वारंटाईन व्हा. तुम्हाला जमत नसल्यास नातेवाईक व मित्रमंडळी या शूर वीर योद्ध्यांची मदत घ्यावी. अगदी टोकाला गेल्यास मानसोपचारतज्ञ या योद्ध्याची मदत घ्या. ते तुम्हाला इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करतील, अर्थात दवाखान्यात भरती करून उपचार देतील.
याचा परिणाम व फायदा म्हणजे तुमच्याकडून असं काही घडणार नाही ज्याबद्दल तुम्ही आयुष्यभर स्वतःला दोष देत रहाल. “होत्याचं नव्हतं झालं” याऐवजी तुम्ही म्हणाल “थँक्स लॉकडाऊन” “थँक्स क्वारंटाईन”.
डॉ. संताजी शेळके
मानसोपचारतज्ज्ञ
बारामती