अन्न, वस्त्र आणि निवारा या प्राथमिक गरजांबरोबर मनुष्य प्राण्यासाठी मानसिक आरोग्य ही गोष्ट तितकीच महत्त्वाची आहे. आपत्ती व आणीबाणीच्या काळात मानसिक आरोग्य खूपच महत्त्वाचे आहे. कोरोना आणीबाणीशी दोन हात करताना वैयक्तिक, कौटुंबिक व सामाजिक मानसिक आरोग्याविषयी जागृत होणे व राहणे महत्त्वाचे आहे.
मानसिक आरोग्यामध्ये आपले विचार, आपले बोलणे, आपली कृती आणि वर्तणूक यांचा समावेश होतो. कोरोनासारख्या आपत्ती बरोबर समायोजन करताना प्रत्येक व्यक्ती पुन्हा पुन्हा काही भावनिक व मानसिक अवस्थांमधून कमी-अधिक प्रमाणात जात असतो. बेचैनी, चिंता, भीती, ताण आणि राग या भावना यशस्वीरित्या पार केल्यास विकास व विवेक ही अवस्था आपण गाठू शकतो.
आता काय होईल? आपलं व आपल्या कुटुंबाचं काय होईल?अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला निरुत्तर करतात.
प्रथम ही गोष्ट समजून घ्या की वरील सर्व प्रकारच्या भावना व प्रश्न मनात येणे ही अतिशय नॉर्मल व नैसर्गिक अशी ओघानेच येणारी गोष्ट आहे. या भावना आणि हे प्रश्न आपलं मानसिक आरोग्य शाबूत असल्याचं लक्षण आहे. या सर्व भावना, हे सर्व प्रश्न आणि हे सर्व विचार आपल्याला आणीबाणीशी समायोजन करायला मदतच करतात. त्यामुळे कृपया घाबरून जाऊ नये. यामध्ये मानसिक आजार किंवा वेडेपणा किंवा रुग्ण झाल्याची कोणतीही लक्षणे नाहीत.
कोरोनासारखा शत्रू आपल्या दरवाजावर, टेबलवर, फरशीवर, हातावर, कपड्यांवर, चावीवर, चष्म्यावर, मास्कवर, फळ भाज्यांवर, पैशांच्या नोटांवर कुठेही जिवंत राहू शकतो व आपल्या नाका-तोंडात गुप्तपणे व आपल्या नकळत प्रवेश करतो. अशा काळात भीती, चिंता, ताण, काळजी न वाटणे म्हणजे काहीतरी मानसिक दोष असल्याचे लक्षण आहे. अशावेळी सदर व्यक्तीला स्वतःकडे, कोरोनाकडे आणि या सर्व गोष्टींकडे जागृत होऊन गांभीर्याने बघण्याची गरज आहे.
आपण आपलं स्वतःच जग आणि आपल्या अवतीभवतीच जग यांना प्रामुख्याने दोन विभागात विभागून घ्या. त्यातला एक विभाग असेल ज्यावर आपला पूर्ण प्रभाव असेल आणि दुसरा विभाग असेल ज्यावर आपला बिलकुल काहीही प्रभाव नसेल.
स्वतःला विचारा या गोष्टीवर, घटनेवर किंवा व्यक्तीवर आपला काही प्रभाव आहे का? ऊत्तर ‘नाही’ असणाऱ्या गोष्टी वळवण्याचा किंवा बदलण्याचा प्रयत्न करू नये, त्यामुळे आपल्याला आलेल्या समायोजित ताणाचे रूपांतर मानसिक आजारात होऊ शकते.
दुसरा विभाग प्रामुख्याने आपल्या प्रभावाखाली असेल आणि यावरच आपण पूर्ण लक्ष व ध्यान केंद्रित करायचं आहे.
आपलं काम, उद्योग-व्यवसाय आपण घरी बसून करू शकतो का? करू शकत असेल तर तो नक्कीच करावा.
एखादी आवडती कादंबरी आपली वाचायची राहून गेली असेल तर हीच वेळ आहे ती कादंबरी वाचायला सुरू करण्याची.
नियम, सुव्यवस्था व कायदे कानून पाळणे हे सोपे आहे व सर्वांसाठी फायद्याचे आहे हे आपण सिद्ध करू शकतो.
आपलं घर आपल्यासाठी व आपल्या कुटुंबीयांसाठी जगातलं सर्वात सुरक्षित व प्रेमळ ठिकाण आहे हेही आपण दाखवून देऊ शकतो.
साबणाने हात धुणे, स्वतःचे कपडे धुणे, इस्त्री करणे, स्वयंपाकात मदत करणे ई. कामे केल्याने शारीरिक व मानसिक आरोग्य सुधारण्याचा अनुभव आपण घेऊ शकतो. दरवाजाचे हॅन्डल, मोबाईल, कम्प्युटर, लॅपटॉप व घरा बाहेरून आणलेल्या वस्तू शांतपणे, निवांतपणे व हळुवारपणे निर्जंतुक करू शकतो. यालाच माईंड फुलनेस मेडिटेशन असेही म्हणतात.
बातम्या, ब्रेकिंग न्यूज, सोशल मीडिया, टीका, निंदा यावरचा वेळ आपण कमी करून तो वेळ विनोदी कार्यक्रम, चित्रपट, माहितीपट, वाचन, लेखन, प्रेम, दया, सहानुभूती आणि सद्सद्विवेकबुद्धी या गोष्टींवर खर्च करू शकतो.
स्मितहास्य तसेच कृपया, धन्यवाद आणि माफ करा या शब्दांचा वापर जादूई असतो याचा अनुभव आपण घेऊ शकतो.
‘मुलांना वेळ देऊ शकत नाहीत!’ अशा पालकांसाठी तर ही सुवर्णसंधी आहे. आपल्या मुलांची मैत्री करा, त्यांना समजून घ्यायला शिका, त्यांचे विचार, भावना कुठलीही आडकाठी न ठेवता ऐकून घ्या. त्यांच्यावर निरपेक्ष प्रेमाचा वर्षाव करा.
दररोज आपल्या कुटुंबीयांसाठी कुठलीही एक प्रेमाची व दयाळूपणाची कृती करा.
घरबसल्या सूर्योदय, सूर्यास्त, पक्ष्यांची किलबिल, झाडांची सळसळ आणि रस्त्यावरील शांतता यांचा अनुभव घ्या. असे अलौकिक अनुभव मिळाल्याबद्दल निसर्गाचे व परमेश्वराचे धन्यवाद माना.
आपले व आपल्या प्रिय व्यक्तींचे बालपणाचे, लग्नाचे, तरुण पणाचे, कॉलेजमधील कार्यक्रमांचे, कौटुंबिक कार्यक्रमाचे, वाढदिवसाचे, सहलींचे फोटो अल्बम पाहून आनंदित व्हायची हीच ती वेळ आहे.
एखादा लेख, कथा, कविता लिहायची खूप दिवसापासूनची इच्छा आता घर बसल्या तुम्ही पूर्ण करू शकता.
जे नेहमीच म्हणतात की ‘दारू मी कधीही सोडू शकतो!’ हीच वेळ आहे हे सिद्ध करण्याची की आपण लिंबू शरबत व छास, ताक पिऊन सुद्धा आनंदाने राहू शकतो.
आपण नेहमी म्हणतो की ‘मीच माझ्या मनाचा मालक आहे!’ हीच वेळ आहे सिद्ध करून दाखवण्याची की हो खरंच मीच माझ्या मनाचा मालक आहे. मीच माझी वृत्ती, बोलणं, वागणं आणि माझा दृष्टिकोन ठरवतो. कोणीही, कधीही माझ्या भावनांचा व विचारांचा रिमोट कंट्रोल माझ्या परवानगीशिवाय त्यांच्या हातात घेऊ शकणार नाही. कोणत्याही घटनेचा, कोणाच्याही बोलण्याचा, कोणाच्याही प्रतिक्रियेचा मी सकारात्मक अर्थच काढेन, याची मी काळजी घेतो मग माझ्या पुढे कितीही मोठं संकट असो. हे सिद्ध करण्याची हीच ती वेळ आहे.
स्वतःची चौकशी करून, स्वतःची विचारपूस करून, स्वतःसाठी काहीतरी प्रेमळ, मायाळू कृती स्वतःने करण्याची ही वेळ आहे. म्हणूनच आपण घरबसल्या ध्यान, प्राणायाम, योग या गोष्टी घरबसल्या करू शकतो. आपण आपला वेग मंद करायला व थोडे थांबायला शिकू शकतो. काही मदत लागल्यास ऑनलाइन मी कोणत्याही अध्यात्मिक व्यक्तीशी संपर्क साधू शकतो.
तर मग जागे व्हा, ऊठा, डोळे ऊघडा आणि स्वतःला प्रश्न विचारा, ” मी आत्ता काय करू शकतो?” आणि स्वतःचा शोध सुरू करा. हाच कोरोनाशी निगडित सर्व संकटांचा अंत असेल.
डॉ. संताजी शेळके MD
मानसोपचार तज्ञ,
बारामती