संघर्ष अवकाश:

संघर्ष अवकाश:
आपल्या विचारांशी व भावनांशी आपल्याच विचारांचा व भावनांचा आजीवन संघर्ष सुरु असतो. हा संघर्ष समजून घेण्यासाठी व थांबविण्यासाठी आपल्याजवळ एक उत्तम मार्ग व पद्धत अगोदरपासून असणे खूप गरजेचे आहे. हे करण्याचा ‘अवकाश’ तयार करणे’ हा एक मार्ग आहे. आपण नेहमीच ‘वैयक्तिक अवकाश’ किंवा ‘पर्सनल स्पेस’ याबद्दल गप्पा मारत असतो आणि त्याची मागणीही करत असतो. कठीण व नकारात्मक विचार आणि भावना यांच्याशी संघर्ष करण्यासाठी व त्यांना सामावून घेण्यासाठी आपल्या वैयक्तिक अवकाशामध्ये या विचारांना भावनांना ‘एक स्वतंत्र अवकाश देणे’ खूप गरजेचे आहे.

हे अवकाश तयार करण्याचे कौशल्य शिकण्यासाठी आकाशाचा विचार व कल्पना करणे उपयुक्त आहे. हवामान कितीही खराब असो आकाशात त्याला जागा आहे. आकाशाला कधीही त्या खराब हवामानाने दुखापत होऊ शकत नाही. ते हवामान तीव्र उष्ण व रुक्ष असो किंवा कीतीही थंड व वादळी असो लवकरच आणि नेहमीच बदलत राहते. आपले विचार आणि भावना हवामानासारख्याच असतात, अर्थात नेहमी बदलत असतात. आपण आकाशासारखं व्हायला शिकू शकतो आणि आपल्या कठीण विचारांना आणि भावनांना “स्वतंत्र अवकाश” मिळवून देऊ शकतो. या अवकाशामुळे आपण स्वतःला व इतरांना दुखापत न करता कठीण, खराब व संकटमय परिस्थितीवर मात करू शकतो.

प्रथम शांतपणे कठीण विचार व भावना लक्षात घ्या आणि त्यांना नाव द्या. उदा. माझ्या लक्षात येते आहे की येथे पोटात व छातीत धडधडत आहे,
येथे एक नकारात्मक विचार आहे. हे विचार व भावना लक्षात घ्यायच्या आणि त्यांकडे जाणून व समजून घ्यायच्या हेतूने पहायचे. कल्पना करायची की हे विचार आणि भावना हवामान व वातावरण यासारख्याच आहेत. उदा. भीती, नकारात्मक भावना, कडवट आठवणी, दुष्ट विचार. लक्षात ठेवा आपण नेहमीच आकाशासारखे असतो. आकाशात आलेल्या खराब हवामानावरून आकाशाचा खरा अंदाज बांधता येत नाही. अगदी त्याच प्रकारे आपल्या मनात आलेल्या भावना, आठवणी आणि विचारांवरून आपला स्वत:चा अंदाज बांधता येत नाही. आपण अगदी आकाशासारखेच बनायचे आहे. या विचार व भावनांसाठीसुद्धा एक अवकाश ठेवायचा आहे अथवा एक खोली बनवायची आहे. आपल्या मनातील ‘कठीण विचार व नकारात्मक भावना’ याकडे आकाशातील खराब हवामान पाहिल्यासारखेच पाहायचे आहे.

आणि हे करत असतानाच हळूहळू व सावकाश श्वासोच्छवास चालू ठेवायचा आहे. श्वास पूर्णपणे सोडून द्यायचा व फुफ्फुसे रिकामी करून तीन अंक मोजायचे. आता सावकाश श्वास घ्यायचा आणि फुफ्फुसे पूर्ण भरून तीन अंक मोजायचे. हळूहळू व सावकाश श्वास घेणे व सोडणे सुरू ठेवायचे.

आता आपल्या कठीण विचार व नकारात्मक भावना यांना मनाच्या अवकाशात स्वतंत्र जागा करून देण्याचा प्रयत्न करायचा. त्यासाठी कल्पना करा की नकारात्मक शारीरिक भावना, विचार आणि मानसिक वेदना, व्यथा ही एक वस्तू आहे. कल्पना करा की त्या वस्तूला एक रंग, आकार, छबी व तापमान आहे. उदा. छातीवर ठेवलेली तपकिरी रंगाची ठेवलेली वीट, पोटावर ठेवलेला दगड. त्या कल्पना केलेल्या वीट, दगड किंवा इतर वस्तूंच्या आजूबाजूने आपल्या श्वासातील हवा जात येत आहे. त्या वस्तूंच्या असण्याने आपल्या श्वासावर काहीही परिणाम होत नाही. अर्थात वीटा, दगड व तत्सम वस्तूंमुळे आपले शरीर, मन, बुद्धी व क्रुती यांच्या कामांमध्ये कसलाही फरक पडला नाही.

आणखी एका पद्धतीत कल्पना करायची की कठीण व नकारात्मक विचार व कडू आठवण ही आपल्या पुस्तकातील पानांवर काढलेले शब्द किंवा चित्रं आहेत. उदा. “मी अशक्त आहे. मी हे करू शकत नाही.” ही वाक्ये शब्दरूपात व चित्ररूपात आपल्या पुस्तकात काढलेली आहेत आणि ते पुस्तक आपण उघडून पाहत आहोत अशी कल्पना करावी. कल्पना करा की ही चित्रे आणि वाक्ये असलेले पुस्तक आपण आपल्या मांडीवर ठेवून दिले आहे आणि उत्साहाने आपण जगातील आपली कामे करीत आहोत. ही चित्रं व वाक्ये असलेली नोंदवही आपण आपल्या खिशात किंवा हातात घेऊन, आपली दैनंदिन कामे आपण उत्तम प्रकारे करत आहोत अशी ही कल्पना आपण करू शकतो. म्हणजे विचार व भावना अद्याप आपल्या सोबत व आपल्याकडेच आहेत, परंतु तरीही आपण आपल्या सभोवतालच्या जगात उत्साहाने व तन्मयतेने आपले हातातील काम सुरू ठेऊ शकतो.

आपले ध्येय फक्त कठिण विचार व नकारात्मक भावना यांना अवकाश अथवा जागा तयार करणे हे आहे. त्या विचारांशी होणारी आपली लढाई व संघर्ष थांबविणे आणि त्या विचारांना व भावनांना “स्वतंत्र जागा अथवा अवकाश” आपल्या मनात तयार करून देणे हा आपला उद्देश आहे. जेव्हा जेव्हा आपल्याला आपले कठीण विचार व भावना आपल्या मूळ मुल्यांपासून बाहेर ओढून काढायला सुरुवात करतील, तेव्हा तेव्हा आपण ही गोष्ट लक्षात घेणे, श्वासोच्छ्वास सावकाश व हळूवार करणे आणि मनामध्ये त्या खराब व कठीण विचारांना व भावनांना ‘स्वतंत्र अवकाश व जागा’ तयार करून देणे या पायऱ्यांची मदत आपण घेतलीच पाहिजे. हाच खरा आपला वैयक्तिक अवकाश अथवा पर्सनल स्पेस असेल. याच ‘संघर्ष अवकाशात’ आपण आपले सारे खराब, दुखरे, कठीण व नकारात्मक विचार आणि भावना ठेवून देऊ शकतो. चला तर मग आजपासून आपल्या आपल्याशी व इतरांशी अव्याहतपणे चालणाऱ्या संघर्षासाठी स्वतंत्र ‘संघर्ष अवकाशाची’ स्थापना करूयात, जेणेकरून आपली मूळ मूल्यं व आदर्श यांचं निरभ्र व विस्तीर्ण अवकाश, पुन्हा आपल्या जीवनात आनंद, समाधान, सुख व सम्रुद्धी घेऊन येईल.
डॉ. संताजी शेळके
मानसोपचारतज्ज्ञ
बारामती

Leave a comment