आपण व आपली मुले:
आपल्या मुलांशी जेव्हा आपण खालील पद्धतीने संवाद साधू तेव्हा त्यांच्यावर याचा काय परिणाम होत असेल याची कल्पना करा.
“छे छे, ह्याने खूप त्रास होऊच शकत नाही.”
“यात काय आहे एवढं नाराज होण्याइतकं”?
“भरल्या घरात रडायला काय झालंय तुला.”
“तू एका छोट्या गोष्टीचा बाऊ करीत आहेस”.
“बाकी मुले बघ, ते कधीही तक्रार करत नाहीत.”
“तू एखाद्या कुक्कुल्या बाळासारखे वागत आहेस.”
“उगीच का रडतो आहेस, एखाद्या मुलीसारखा.”
“बरं, हळूहळू तूला त्या नकोशा गोष्टीची सवय होईल.”
जेव्हा आपण आपल्या मुलांच्या भावना पुसून टाकतो, पुरून टाकतो, बाजूला सारतो किंवा नाकारतो, तेव्हा आपली मुले अधिक रागीट व क्रोधित होतात. आपली मुले त्यांच्या मूळ समस्येबाबत जास्त अस्वस्थ होऊ लागलात आणि शेवटी आपल्या पालकांशी डोकं फिरल्यासारखे व सटकल्यासारखे वागू लागतात. जेव्हा आपल्या भावना नाकारल्या जातात तेव्हा सामान्यत: आपल्यासमोर हाच एक मार्ग असतो. यात आपण आणि आपली मुले ऐकमेकांच्या विरोधात उभे राहतो व हा विरोध दिवसेंदिवस वाढतच जातो. समस्यामागून समस्या येत राहतात आणि आपले व आपल्या मुलांचे वैर विकोपाला जाऊ लागते. आपली व आपल्या मुलांची हार होते व समस्या विजयी होतात. ही अवस्था नक्कीच बिकट आहे आणि आपल्याला व आपल्या मुलांनाही ती नकोशी आहे.
आपल्या मुलांशी जेव्हा आपण खालील पद्धतीने संवाद साधू तेव्हा त्यांच्यावर याचा काय परिणाम होत असेल याची कल्पना करा.
“असं वाटतंय की तुला खरंच खूप दुखतंय.”
“हे तुझ्यासाठी फारच भीतीदायक असावे.”
“हां, तुला त्याबद्दल खरोखरच वाईट वाटतंय!”
“तुझ्यासारख्या वेदना तुझ्या सर्वात वाईट शत्रूलाही होऊ नयेत.”
“असं वाटतंय की तुला खूप वाईट वाटत आहे.”
“मला वाटतंय की, तु नाराज झालेला आहेस.”
“तु फारच उदास झालेला आहेस.”
“तूला तुझ्या भावाचा खूप राग आलेला दिसत आहे”.
“मला वाटतं, तुला अपराधी वाटत असावं.”
“तू त्या गोष्टीबद्दल बेचैन वाटतोस.”
हे सर्व प्रतिसाद दर्शवतात की आपण आपल्या मुलाने व्यक्त केलेल्या भावना ऐकू आणि स्वीकारू शकतो. जेव्हा आपण आपल्या मुलांच्या भावनांचा स्वीकार करतो, तेव्हा आपण विरुद्ध मुले हे चित्र बदलते व आपण आणि मुले, विरूद्ध मुलांच्या समस्या असे चित्र निर्माण होते. आपण आपले सामर्थ्य व अनुभव यांचा उपयोग खरोखरच आपल्या मुलांसाठी उपयुक्त पद्धतीने करतो. या पद्धतीने मुलांमध्ये आपल्या पालकांबद्दल अधिक प्रेम, आदर व आज्ञाधारकपणा तयार होतो. जेव्हा आपण एखाद्या मुलाच्या भावना ओळखतो व त्या विनाअट स्वीकारतो, तेव्हा आपण त्याची एक महान सेवा करत असतो. आपण आपल्या मुलाला त्याच्या अंतर्गत वास्तवाशी संपर्क साधायला मदत करतो. एकदा का त्याला ती वास्तविकता स्पष्ट झाली, की तो त्याच्या समस्येशी स्वतःच झुंज सुरू करण्यासाठी सामर्थ्य गोळा करायला सुरुवात करतो. या झुंजीत आपली व आपल्या मुलांची सामूहिक जीत व भावनिक समस्येवर मात, निश्चित आहे. ही अवस्था नक्कीच आपल्याला व आपल्या मुलांना आवडणार व हवीहवीशी वाटणार हे वेगळे सांगायला नकोच.