चिंतन व कृती:

आपल्या मनात कोणते विचार येतात? यापेक्षा आपण त्यांमधील कोणते विचार चिंतन व कृती करण्यासाठी निवडतो? त्यावर आपले फळ व भविष्य ठरते, हे समजून घ्यायला शिकूया.

भले:

‘इतरांचे काय वाट्टेल ते होवो, आपले तेवढे भले झाले म्हणजे झाले’, या विचारातून केलेल्या जास्तीत जास्त प्रयत्नांतून जास्त दुःखच निर्माण होऊ शकते, हे समजून घ्यायला शिकूया.

दुःखी:

दुःखाचे चिंतन करणे, दुःख सांगत सुटणे, दुःखी पर्याय निवडणे व दुःखस्वप्ने पाहणे हे आपले जीवन दुःखी करण्याचे खात्रीचे उपाय आहेत, हे समजून घ्यायला शिकूया.

माणूस:

स्वतःचा स्वार्थ साधून इतरांनाही त्यांचा स्वार्थ साधू देतो तो माणूस, तर इतरांचा विचारही न करता फक्त स्वतःचा स्वार्थ साधतो तो पशू, हे समजून घ्यायला शिकूया.

भाग:

आपल्या ज्या गुणांना आपले आसपासचे लोक वारंवार वाव, प्रतिसाद, वाहवा व किंमत देतात ते गुण वाढत जातात व ते आपल्या नकळत आपल्या व्यक्तीमत्वाचा अविभाज्य भाग बनतात.

कुठे जायचे:

जर आपल्याला, कुठे जायचे आहे? व का? हे माहिती नसेल, तर आपल्याला कुठे थांबायचे आहे? व का? हे कधीही समजणार नाही, म्हणून या प्रश्नांची उत्तरे शोधायला शिकूया.

थांबायचे:

जीवनात अपार कष्ट व प्रयत्न करूनही आपल्या मनात शांतता नसेल, अपयशाची व दुःखाची भावना असेल, तर थोडं चिंतन करून थांबायचे कुठे? या प्रश्नाचे उत्तर शोधायला शिकूया.

गैरसमज:

आपण अडचणीतून बाहेर येण्याचा प्रयत्नही करत नाही व मदतही घेत नाही कारण ‘जे नशीबात व दैवात आहे ते भोगावेच लागणार’ हा गैरसमज, हे समजून घ्यायला शिकूया.