पुनर्जन्म:
जगातील सर्व छोटे मोठे संघर्ष कोठे सुरू होतात? जगातील सर्वात जास्त वादविवाद कोठे घातले जातात? जगातील सर्व लहान मोठी युद्धं कोठे केली जातात? त्याचबरोबर जगातील सर्व सुखं, शांती, दया, क्षमा, विकास व उत्क्रांती यांचा उगम कोठे आहे? या सर्व प्रश्नांचं उत्तर एकच आहे, ते म्हणजे आपलं मन.
बाह्य जगामध्ये अस्तित्वात असणारी प्रत्येक गोष्ट, वस्तू किंवा निर्मिती ही त्याअगोदर मानवी मनामध्ये तयार झाली होती. गोष्ट चांगली असो की वाईट, उत्तम असो की साधारण, वैयक्तिक अस़ो की सामाजिक, कल्याणकारी असो की विघातक सर्वांचा जन्म प्रथम मानवी मनामधे होतो. या सर्व गोष्टी अद्रुष्य मनातील रूपातून बाह्य जगातील द्रुष्य रुपामध्ये रुपांतरित होतात.
मनाला मायावी म्हणजे इच्छेनुसार रुप धारण करणारे असेही म्हणतात. मनाला कल्पतरू म्हणजे कल्पनेनुसार फळ देणारे असंही म्हणतात. त्यामुळे मनुष्यप्राणी हा ऐकमेव प्राणी ठरतो जो, मनात ठरवलेले हवे ते नाटक व सोंग हुबेहूब वटवू शकतो. इच्छेनुसार हवे तेव्हा, हव्या त्या कल्पनेला साक्षात व प्रत्यक्ष असल्यासारखे अनुभवू शकतो. मनाच्या या क्षमता जादुई आहेत व त्या आपल्याला आश्चर्यचकित करतात.
आता गंमत बघा! आपल्याला बाह्य जगात यश, सुख, समाधान, शांती, सम्रुद्धी, आनंद, भरभराट व उत्तम नातेसंबंध हवे असतात. या गोष्टींचा ऊगम मनातून व्हायला हवा. मनामध्ये राग, द्वेष, लोभ, मोह, मत्सर यांना प्रोत्साहन देणारे कोणतेही विचार व धारणा असतील तर त्यांना जाग्रत मनाच्या मदतीने ओळखायला हवं. पोटात एक व ओठावर दुसरे असे असेल तर द्विधा अवस्था तयार होणार. अशा वेळी मनातल्या गोष्टी वेळीच दुरुस्त करून घेतल्या पाहिजेत. दिसताक्षणी गोळया घालणारे कमांडो विचार मनात तयार ठेवावेत. त्यांची एक फौज मनात तयार करावी. दैनंदिन जीवनात बाह्य जगात खरे होऊ नयेत अशा विचारांना “सावधान” म्हणून मनाच्या क्षेत्रातून हद्दपार करण्याची मनाला आज्ञा द्यावी. फक्त मंगल व शुभ विचारांना आनंदाने हुंकार द्या.
निवांत वेळी व विश्रांतीदरम्यान आपल्या कल्पना कार्यरत असतात. हे कल्पनाविश्व आपल्याला हव्या असणाऱ्या भावना व इच्छित भविष्य, क्रुती व परिणाम यांविषयी असावे. कल्पनेतील प्रतिमा, चित्रे व चलचित्रे ही स्वतःचं आरोग्य, संपन्नता, उत्तमता, करुणा, प्रेम, सुदृढ नातेसंबंध याविषयी असावीत. याव्यतिरिक्त काहीही आपल्याला नकोसे चोरपावलांनी आपल्या मनात जाऊन घरफोडी करण्याचा प्रयत्न करीत असल्यास “जागते राहा” ही आज्ञा जाग्रुत मनाला करा. या आज्ञेने हळूहळू नको त्या सर्व कल्पनांना रोजच्या रोज न चुकता मन:पटलावरुन पुसून काढा. वेळ दवडू नका, नकोशा रंगांनी रेखाटली गेलेल्या सर्व कल्पना, कालांतराने कालवश होतील.
या दोन आज्ञा वेळ व प्रसंग पाहून वापरायला सुरुवात करावी. “सावधान” व “जागते राहा” या दोन स्वआज्ञा पाळण्याचे मनाला प्रशिक्षण देऊया. दररोजच्या सरावाने या स्वआज्ञांचे सवयीत रुपांतर होईल. मग आपल्या सर्व इच्छा, स्वप्नं, ध्येयं, उद्दिष्टं व आकांक्षा बाह्य जगात जन्म घेणार व हाच आपला असेल; पुनर्जन्म.
डॉ. संताजी शेळके
मानसोपचारतज्ज्ञ
बारामती