प्रतिमा:
आपल्या मनामध्ये बालपणापासून वेगवेगळ्या माध्यमातून प्रत्येक गोष्टीची एक प्रतिमा तयार झालेली असते. या प्रतिमा तयार करण्यामध्ये आपले आई-वडील आणि कुटुंबातील नातेवाईक आपल्याशी काय बोलतात, आपल्याला काय सांगतात, आपल्याशी कसे वागतात, आपल्यासमोर आणि आपल्या पाठीमागे कसे वर्तन करतात या गोष्टींचा हात असतो. शिक्षक, सगेसोयरे, मित्र, अभिनेते व अभिनेत्री, सामाजिक कार्यकर्ते व नेतेमंडळी यांचाही प्रभाव या प्रतिमा निर्मितीमध्ये खूप प्रमाणात असतो.
या प्रतिमा आपल्या मनामध्ये शब्द, वाक्य, चित्र, कल्पना, धारणा, मान्यता, विचार आणि चलचित्र या स्वरूपामध्ये साठवल्या गेलेल्या असतात.
या प्रतिमा आपण वेगवेगळ्या व्यक्तींशी, वेगवेगळ्या प्रसंगात व समस्येत, आनंदात अथवा दु:खात कसे वागू, काय बोलू व करु हे ठरवत असतात. इतर सर्व या प्रतिमांशी सुसंगत व मिळतेजुळते वागल्यास, बोलल्यास, ऐकल्यास व दिसल्यास आपल्याला बरं वाटत. या प्रतिमांशी विसंगत असे काहीही अनुभवास आल्यास आपल्याला ताणतणाव, दुःख, वेदना, संघर्ष व समस्या या जाणवत असतात.
आपल्या मनात पालक, शिक्षक, मुलगा, मुलगी, आजी, आजोबा, नवरा, बायको, शाळा, शिक्षक, नोकरी, नेता, यश, अपयश, हारजीत, अधिकारी, पोलीस, डॉक्टर, इंजिनीअर या आणि अशा लाखो करोडो प्रतिमा तयार असतात. आपली स्वत:ची सुद्धा एक प्रतिमा अंतर्गत मनात तयार झालेली असते. यातील काही प्रतिमा या सकारात्मक अनुभव आणि माहिती यांनी सकारात्मक झालेल्या असतात, तर काही प्रतिमा या नकारात्मक अनुभव आणि नकारात्मक माहिती यांनी नकारात्मक प्रकारच्या झालेले असतात.
दैनंदिन जीवनामध्ये वागताना, बोलताना व पाहताना आपल्याला आलेले अनुभव आपल्या मनातील प्रतिमेशी सुसंगत असतील तर आपल्याला छान वाटतं आणि त्या प्रतिमा आपण सांभाळून व जपून ठेवतो. याउलट जर आपल्याला अंतर्गत प्रतिमेशी विसंगत असा अनुभव आला तर सहसा आपल्याला पटत नाही किंवा आपण वादविवाद करून आपली प्रतिमा कशी बरोबर आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो. आपण अशी अपेक्षा करतो की समोरच्या व्यक्तीने आपल्या अंतर्गत प्रतिमेला अनुरूप वागावं, बोलावं, चालावं आणि आपल्याशी तसाच प्रतिसाद द्यावा.
आपण एखाद्यावर रागावलो, चिडलो किंवा नाराज झालो तर ते समोरच्या व्यक्तीबद्दल व व्यक्तीवर नसून आपण आपल्याच मनातील अंतर्गत प्रतिमेवर नाराज झालेलो असतो. समोरच्या व्यक्तीला पूर्ण स्वातंत्र्य आहे आणि समोरची व्यक्ती पूर्णपणे वेगळी व्यक्ती आहे, आणि आपल्या अंतर्गत प्रतिमांबद्दल त्या व्यक्तीला बिलकुलच काही माहीत नाही हे आपण विसरून जातो. आपण जर जागरूकतेने, आत्मभानाने व सावधानतेने आपल्या अंतर्गत प्रतिमांमध्ये आणि समोरच्या वास्तवातील व्यक्तीमध्ये अंतर करायला शिकलो नाही तर आपल्या अंतर्गत प्रतिमांनाच आपण बाहेरील प्रत्यक्ष व्यक्ती समजून बसतो. आपण आपल्या मनातील इतरांच्या अंतर्गत प्रतिमांशी आपल्याच मनात भांडत बसतो.
चांगली गोष्ट ही आहे की आपण स्वतः अंतर्मुख होऊन, सरावाने व समजून घेऊन आपल्या अंतर्गत मनातील प्रतिमा बदलू शकतो. आपल्या अंतर्मनातील प्रतिमा जर सकारात्मकता, प्रेम, दया, करुणा, साकल्य, क्षमाभाव, सद्भाव, भलेपणा, सद्सद्विवेकबुद्धी आणि क्रुतज्ञताभाव यांच्या चाळणीतून चाळून घेतल्या, या आरशात पाहून निरखून घेतल्या तर आपल्या या प्रतिमा सकारात्मक व विकासात्मक प्रतिमांमध्ये परिवर्तित होतील. मग आपण बाह्य जगातील, समाजातील व नातेसंबंधातील लोकांना बदलण्याचा हट्ट करणे सोडून देऊ. त्याऐवजी आपण आपल्या स्वतःच्या अंतर्गत प्रतिमांमध्ये ऐच्छिक बदल करून ताणतणावांना, दुःखांना, निराशा व वेदना या नकारात्मक भावनांना आनंद, सुख, समाधान व शांती या उच्च भावनांमध्ये परावर्तित करू शकतो.
पण लक्षात ठेवा हे फक्त आणि फक्त! आपणच आणि आपणच! स्वतःसाठी आणि स्वतःसाठी! आणि स्वतःच आणि स्वतःच! करू शकतो. दुसरं कोणीही, कधीही, कुठेही आणि कोणासाठीही हे करू शकत नाही.
डॉ. संताजी शेळके
मानसोपचारतज्ज्ञ
बारामती