भीती:
शालेय जीवनात परिक्षेत पेपर लिहताना जास्त गुण मिळवणे हे विध्यार्थ्याचे ध्येय असते. गुणांवरून त्याची बुद्धिमत्ता व भवितव्य ठरवले जाते. त्यामुळे जे प्रश्न वारंवार परिक्षेत येतात त्यावर लक्ष देणे व इतर प्रश्नांना टाळणे हे तो छान शिकतो. त्यामुळे सर्वजण त्यात्यावेळी कौतुक करतात व बक्षिसही देतात.
विद्यार्थी हळूहळू त्या गोष्टीत पारंगत होतो. तो त्याच्या साठी आरामदायी स्थिती तयार करतो व त्याची जीवापाड जपनुक करतो. त्याला काय अावडते, त्याला कशात रस आहे, त्याच्या आवडीनिवडी तो बाजूला सारतो. तसे न केल्यास तो बंडखोर किंवा स्वार्थी ठरवला जातो. जिथे त्याला चूक होईल असे वाटते किंवा अपयश येईल असे वाटते तो भाग तो सोडून द्यायला शिकतो.
शंभर टक्के बरोबर असण्याची शक्यता असल्यावर तो प्रयत्न करतो अन्यथा ती गोष्ट तो टाळतो. त्याला चुका होण्याची व अपयशाची भीती वाटायला लागते. त्याला कौतुक न होण्याची किंवा नाकारले जाण्याची भीती वाटायला लागते. याच भीती नंतर त्यांच्या ध्येय निश्चित व साध्य करण्याच्या व त्यासाठी चिकाटीने प्रयत्न करण्याच्या मार्गातील सर्वात मोठे अडथळे ठरतात.