ह्रदयापासून ह्रदयापर्यंत:
आपण जेव्हा अस्वस्थ, नाराज, बेचैन किंवा दु: खी असतो, तेव्हा कितीही चांगला सल्ला आपल्याला नकोसा वाटतो. कोणतेही तत्वज्ञान, युक्तिवाद, मानसशास्त्र किंवा दृष्टिकोन ऐकण्याची आपली मनस्थिती नसते. जेव्हा अशा प्रकारची चर्चाही आपल्यासमोर होते, तेव्हा आपल्याला पूर्वीपेक्षाही जास्त वाईट वाटते. ‘बिचारा ठरवला गेल्यास व दयेस पात्र असल्याचे दाखवल्यास’, आपल्याला स्वतःचीच किव वाटायला लागते. आपल्याला एखाद्याने ‘प्रश्न विचारायला सुरुवात केल्यास’, आपण बचावात्मक होतो. आपल्याला जे काही वाटते ‘तेवढे वाईट वाटण्याचे व जाणवण्याचे काहीच कारण नाही’, हे ऐकायला मिळणे म्हणजे अगदीच केविलवाणी अवस्था होय. अशा प्रकारच्या प्रतिक्रियांवरील आपली प्रतिक्रिया अर्थातच ‘अरे जाऊ दे, सोडून दे, तुला पुढे सांगण्यात काय अर्थ आहे?’ अशीच असणार आहे.
जेव्हा कोणीतरी आपले म्हणणे खरोखर ऐकून घेतात, आपले म्हणणे मान्य करतात, आपल्या अंतर्गत वेदना आणि आपल्याला जे काही बोलायचे आहे, त्याबद्दल अधिक बोलण्याची संधी देतात, तेव्हा आपला भावनिक त्रास कमी होतो आणि आपली अस्वस्थता, नाराजी, बेचैनी आणि गोंधळ कमी होतो. आपल्या भावनांचा आणि समस्यांचा सामना करण्यास आपण स्वतःला सक्षम समजायला लागतो. परंतु सहानुभूतीची व सहअनुभूतीची ही भाषा आपल्याला आपोआप व नैसर्गिकरित्या येत नाही. आपल्यातील बरेचजण आपल्या भावनांना नाकारतच मोठे झाले आहेत. भावना स्वीकारण्याची ही नवीन भाषा शिकण्यासाठी, आपल्याला त्यातील काही पद्धती शिकण्याची आणि त्यांचा अभ्यास व सराव करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी आपल्या भावनिक स्वीकारातील कमतरतांना शोधणे व त्यांना सामोरे जाणे आवश्यक आहे.
अशा वेळी आपण समोरच्या व्यक्तीच्या बोलण्याकडे संपूर्ण लक्ष व ध्यान द्यावे. कोणीतरी कान व लक्ष देऊन ऐकणारा असल्यावर, एखाद्याला आपल्या समस्या सांगणे खूपच सोपे असते. त्या ऐकणाराला काहीसुद्धा बोलण्याची गरज नसते. सहानुभूती व काळजी आहे असे दाखविणारी व मौन अवस्थेत असणारी, हेच गुण ऐकणाऱ्या व्यक्तीकडे असणे आवश्यक असते.
प्रश्न विचारणे आणि सल्ला देणे याऐवजी, प्रेमळ व दयाळू शब्दांचा वापर करून, आपण त्या व्यक्तीच्या भावनांना मान्यता द्यावी. आपल्याला जेव्हा कोणी सल्ला देते, प्रश्नांचा भडीमार करते व तत्वज्ञान सांगायला लागते तेव्हा स्पष्ट, समतोल किंवा विधायक विचार करणे आपणास कठीण होऊन जाते. त्याऐवजी साध्या “अरे देवा, ओह, अच्छा, हांजी, काय ऐकतोय मी हे, मला मदत करावेसे वाटते,” यासारख्या प्रेमळ शब्दांनी व काळजीने ऐकून घेण्याच्या वृत्तीने, ती व्यक्ती स्वतःच्या समस्येवर स्वतःच उपाय शोधून काढते.
भावना नाकारण्यापेक्षा व कमी करण्यापेक्षा, त्या भावनांना नाव द्यायला शिकावे. जेव्हा आपण एखाद्याला त्याच्या वाईट भावना दूर ढकलण्याचा आग्रह करतो किंवा त्या भावना नाकारतो, तेव्हा ते अधिकच अस्वस्थ झाल्यासारखे दिसते. खूप लोकांना अशी भीती वाटते की भावनांना नाव देऊन, ते त्या व्यक्तीची स्थिती आणखी वाईट बनवतील किंवा ती व्यक्ती लाडावेल अथवा डोक्यावर बसेल. परंतु सत्य अगदीच उलट आहे. ज्या व्यक्तीचे बोलणे, शब्द अन् शब्द कान देऊन बारकाईने ऐकले जातात, त्याला मनापासून समाधान वाटते. ‘कोणीतरी आहे जो आपला अंतर्गत अनुभव कबूल व मान्य करतो’, ही भावना व्यक्तीला समस्येचे समाधान शोधण्यास प्रव्रुत्त करते.
व्याख्यान, प्रवचन व तर्कशास्त्र विस्ताराने सांगत बसण्यापेक्षा, रमणीय कल्पनांच्या व स्वप्नांच्या मदतीने व्यक्तीला एक शुभेच्छा द्यावी.
जेव्हा एखाद्या व्यक्तीला काहीतरी हवे असते, पण ते त्यांना मिळवणे शक्य नसते, तेव्हा आपण तार्किक स्पष्टीकरणांसह प्रतिसाद देतो. परंतु बर्याचदा आपण जितके कठोर व तार्किक वर्णन करतो, तितके जास्त ते आपल्या मताचा व आपला निषेध करतात. त्याऐवजी ‘आपल्या सर्व इच्छा आकांक्षा परमेश्वर पूर्ण करो,’ ‘आपली स्वप्ने पूर्ण होवो,’ अशा काल्पनिक व रमणीय शुभेच्छा त्या व्यक्तीला प्रोत्साहन देतात.
परंतु आपण वापरलेल्या कोणत्याही पद्धतीपेक्षा व शब्दांपेक्षा महत्त्वाची म्हणजे आपली मनोवृत्ती व दृष्टीकोन. जर आपला दृष्टीकोन मदतीचा, अनुकंपाचा व दयाळूपणाचा नसेल तर आपण जे काही बोलतो ते बनावट किंवा लबाड असल्यासारखे वाटेल. जेव्हा आपण आपल्या बोलण्यात व शब्दांमध्ये सहानुभूतीची व प्रेमाची भावना ठेवतो, तेव्हा आपण थेट समोरच्याच्या हृदयाशी बोलत असतो.