वैफल्य स्विकार व पालक बालक नातेसंबंध:
मुलांची मनस्थिती जेव्हा निराश, नाराज व वैफल्यग्रस्त होते, तेव्हा त्यांना मदत करण्याचे काही कौशल्य पालकांजवळ असणे गरजेचे आहे. यातील सर्वात पहिले कौशल्य म्हणजे पालकांनी हे समजून घेणे की मुलांचे वैफल्य, नाराजी व दुःख याला आपण पालक जबाबदार नाही. त्याचबरोबर मुलांची वैफल्यग्रस्तता, नाराजी व चिंता आपण वैयक्तिकरित्या घेऊ नये व ती आपल्यामुळेच आहे असे समजून स्वतःला वाईट पालक म्हणून नावे ठेऊ नयेत. त्यांच्या चिंता, काळज्या व दु:खे आपल्या स्वतःकडे ओढून घेण्याची व त्यांत आकंठ बुडून जाण्याची बिलकुलच गरज नाही. अर्थात मुलांबरोबरच आपणही दु:खी, विफल व नाराज होण्याची बिलकुल गरज नाही. मुलांना त्यांचं त्यांचं स्वतःचं विकसनशील असं मन आहे आणि ते त्यांचा आनंद, दुःख, वैफल्य, निराशा किंवा चिंता ते स्वतःच स्वतःच्या मनाच्या सहाय्याने बनवत असतात व पचवायलासुद्धा शिकत असतात.
प्रत्येक स्थळी, प्रत्येक वेळी, प्रत्येक काळी आपली मुले हसरी व आनंदी असावीत, अशा अपेक्षेच्या ओझ्याखाली पालक चिरडले जातात. मुले नेहमीच आनंदी व हसतमुख नसल्यास त्याची कारणे ते स्वतःची एक पालक म्हणून लायकी, किंमत व क्षमता यांमध्ये शोधत बसतात. ही अपेक्षा पूर्ण न झाल्यास व या अपेक्षेला खरे न उतरल्यास पालक स्वतःवरच दबाव आणतात व स्वतःसाठी ताणतणावाचे एक कारण तयार करून ठेवतात. या पालकांवरील दबावामुळे पालक आणि बालक या नात्यातच दबाव आणि ताण तयार होतो. म्हणून निरोगी बालक पालक नातेसंबंधासाठी, बालकाच्या आनंदाची व हसतमुख राहण्याची जबाबदारी बऱ्याच घटकावर अवलंबून असते, फक्त पालकांच्या पालकत्वावर, प्रेमावर व वातावरणावर नाही हे समजून घेणे गरजेचे आहे. अशामुळे मुलांच्या आनंदाची चिंता व काळजी करण्याच्या नादात बालक व पालक या नात्याकडे दुर्लक्ष होते व नात्यांमध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो.
नेहमी आनंदी व हसतमुख राहिले पाहिजे, ही पालकांची अपेक्षा व हट्ट मुलांसाठीही अप्रत्यक्षपणे ओझे ठरू शकते. “काय झाले रडायला. तुझ्या सर्व अपेक्षा पूर्ण करतो हीच का आमची चूक आहे. एवढ्या सगळ्या सुविधा असताना तू नाराज आणि निराश होऊन कसा शकतो. एवढ्या भरल्या घरात तुला काय कमी आहे. कशाची कशाची कमी नाही, चिंता कशाला करतो. खाऊन पिऊन हे काय तुझं नाटक. त्या शेजार्यांच्या मुलांना बघ काही सुविधा नाहीत तरी तो खुश आहे, तुला काय झालं रूसायला. जे जे तुला हवे आहे तेथे सर्व आम्ही देतो, मग तू आनंदी नको का रहायला.” अशा प्रतिक्रिया बालक पालक नात्यांमध्ये दऱ्या तयार करीत असतात.
आता असाही विचार करा की, आपली मुले त्यांच्या मूळ समस्येबद्दल नाराज व दु:खी असतात. त्या मुलांना त्यांच्या मूळ समस्येबद्दल त्यांना मदत करण्याची व त्यातून बाहेर काढण्याची पालकांची मनापासूनची इच्छा असते. आपल्या पालकांना आनंदी व हसतमुख ठेवणे ही मुलांची जबाबदारी आहे, असंही आपल्या मुलांनी कुठेतरी ऐकलेलं असतं. आता ही अपेक्षा ते स्वतःवर लादून घेतात आणि आपल्या आई-वडिलांना आपण खूश व आनंदी ठेऊ शकत नाही, याबद्दल ते स्वतःला अपराधी समजायला लागतात. आपली आई नाराज आहे आहे, आपले बाबा वैफल्यग्रस्त आहेत, आपले पालक आपल्याबद्दल खुश व आनंदी नाही आहेत, असं समजल्यावर मुले आणखी जास्त नाराज, निराश, विफल व वैफल्यग्रस्त होतात. मग मुलांमध्ये ताणाची आणि वैफल्याची मूळ भावना व पालकांच्या अपेक्षाभंगातून येणारी अपराधीपणाची भावना यांच्या बेरजा होत जातात. ही गोळाबेरीज मूळ भावनांपेक्षा खूपच जास्त असते व या एकत्रित भावनांचे वेगळेपण पाहणे व अनुभवणे कठीण होत जाते. अर्थात, सर्व वेळ मुले आनंदी व हसतमुख नसल्याबद्दल ताणतणाव येणे, ही गोष्ट पालकांसाठी, मुलांसाठी व बालक पालक नात्यासाठी घातकच आहे.
म्हणून पालकांनी आपल्या बोलण्यातून व वागण्यातून मुलांना हे समजावून देणे गरजेचे आहे की नेहमी आनंदी आणि हसतमुख असणे चांगले आहे, परंतु तसेच असले पाहिजे असा हट्ट व आग्रह मात्र नाही. नाराज होणे, रडणे, रुसणेफुगणे, निराश होणे, वैफल्यग्रस्त होणे, चिंताग्रस्त होणे हा मुलांचा नैसर्गिक हक्क आहे आणि तो पालकांनी त्यांच्यापासून हिरावून नाही घेतला पाहिजे. ते त्यांचे नैसर्गिक व अपरिहार्य स्वरूप आहे, त्याचा स्वीकार व्हायला हवा, त्यासाठी पालकांनी त्यांना किंवा स्वतःला त्याबद्दल दोष नको द्यायला. मुले रडताना, नाराज, निराश, वैफल्यग्रस्त असतानासुद्धा, जशी आहेत तशी स्वीकारली जाऊ शकतात. त्याबद्दल मुलांचा स्वतःचा कुठलाही दोष नाही, त्याच बरोबर हा दोष पालकांचाही नाही व त्यांनी तो दोष स्वतःला लावून नाही घेतला पाहिजे. पालकांनी त्या प्रसंगांमध्ये मुलांच्या बरोबर राहून त्यांना आधार देण्याचे काम करणे गरजेचे आहे, दोषारोप करण्याचे नव्हे.
पालक आपल्या मुलांच्या दुःखी भावना दूर करण्याचा जितका जास्त प्रयत्न करतात, तितकीच अधिक ती त्या भावनांमध्ये अडकत जातात. पालक जितक्या अधिक आरामात व सहजपणे वाईट भावना स्वीकारू शकतात, तितक्याच आरामात व सहज मुलांना त्या भावना स्वीकारणे, आपल्याशा करणे, पचवणे व सोडून देणे सोपे होऊन जाते. अर्थात जर आपल्याला कुटुंबातील मुले सुखी व आनंदी हवी असतील तर आपण पालकांनी त्यांची सारी दुःखे बोलायला व व्यक्त करायला खुल्या मनाने परवानगी द्यावी. त्यांना त्यांच्या निराशा, चिंता, वैफल्य, रुसवे फुगवे, यांसोबत रहायला वेळ देणे व यादरम्यान पालकांनी त्यांना निस्वार्थ साथ, साद, आधार व प्रेम देणे गरजेचे आहे. जेणेकरून आपली मुले ताणतणावात व नकारात्मक भावनांचे सोबत असतानासुद्धा उत्तमोत्तम व योग्य असेच निर्णय घ्यायला व वर्तन करायला शिकत जातील.
“या भावना व्यक्त करणे खरोखरच खूप कठीण आहे.” असं पालकांनी समजूतदारपणे व सहानुभूतीने म्हटल्यावर मुलांना आपल्या भावभावना शब्दांत व्यक्त करण्याची ताकद व प्रोत्साहन मिळते. यानंतर पालकांनी आपल्या मुलांनी आतापर्यंत बोललेल्या व केलेल्या सर्वोत्तम, छानछान व यथायोग्य गोष्टी व प्रसंग एकेक करून आठवण करून द्यायला सुरुवात करावी. मुलांनाही त्यांनी केलेल्या चांगल्या व सकारात्मक प्रसंगांची आठवण करायला व त्या सविस्तर वर्णन करून सांगायला प्रोत्साहन द्यावे.
आपल्या मुलांच्या मागण्या जर काल्पनिक असतील व आपल्या आवाक्याच्या बाहेरच्या असतील, तर कल्पनेमध्ये त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याची पालकांनी तयारी दाखवणे गरजेचे आहे. “माझी सुद्धा इच्छा आहे की तुला हे मिळावे. मला वाटतं हे तुला मिळालं असतं तर कीती मज्जा आली असती. मला वाटतं हे तर खूपच छान होईल. तुला हे सर्व मिळावं हेच माझं सुद्धा स्वप्न आहे.” असं कल्पनेमध्ये आपल्या मुलांच्या काही इच्छा पूर्ण करणे, हाही त्यांच्या ताणतणावाच्या भावनांवर एक प्रभावी उत्तर असू शकते.
पेन्सिल आणि कागद मुलांच्या हातात देऊन त्यांच्या भावभावना चित्ररूपात, रेषारूपात व शब्दांमध्ये व्यक्त करण्यास पालकांनी मुलांना प्रोत्साहन देत रहावे. त्यांच्या आवडीच्या वस्तू, खरेदीची यादी, स्वप्नांची यादी, फिरायला जायच्या ठिकाणांची यादी, इच्छा व आकांक्षांची यादी इत्यादी लिहून काढण्यासाठी मुलांना प्रोत्साहित करावे. याचा अर्थ असा नाही की पालकांना कोणतीही गोष्ट खरेदी करावी लागेल किंवा त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण कराव्याच लागतील. याचा अर्थ असा होतो की आपल्या मुलांना जे काही आवडते व जे काही आवडत नाही त्याबद्दल पालकांना माहिती आहे, आदर आहे व पुरेशी काळजीही आहे.